कंगनाच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलला ऋतिक रोशन

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादावर आत्तापर्यंत कंगनाकडूनच आरोप केले जात होते. 

Updated: Oct 5, 2017, 05:19 PM IST
कंगनाच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलला ऋतिक रोशन title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादावर आत्तापर्यंत कंगनाकडूनच आरोप केले जात होते. आता मात्र या प्रकरणामध्ये ऋतिक रोशननंही त्याची बाजू मांडली आहे. ऋतिकनं त्याच्या फेसबूकवर कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या पासपोर्टवर जानेवारी २०१४ नंतर भारताबाहेर गेल्याची कोणतीही माहिती नाही. पण मी पॅरिसमध्ये जाऊन साखरपुडा केल्याचं बोललं गेलं. या तथाकथित नात्याबाबत एकच पुरावा आहे, तो म्हणजे फोटोशॉप केलेला एक फोटो. माझ्याकडे ३ हजारांपेक्षा जास्त एकतर्फी मेल आहेत. हे मेल मी आणि त्या महिलेनं पाठवलेले आहेत. सायबर सेल याबाबतचं सत्य कधीही समोर आणू शकतं, असं ऋतिक म्हणालाय.

माझा लॅपटॉप फोन सायबर क्राईम डिपार्टमेंटकडे आहे, पण ती महिला हे सगळं द्यायला नकार देत आहे. अजूनही याची चौकशी बंद झालेली नाही, असं ऋतिकनं या फेसबूक पोस्टवर सांगितलं आहे. या सगळ्या प्रकाराबाबत मला राग आलेला नाही. रागाला मी आयुष्यात स्थान दिलं नाही. आजपर्यंत माझं कोणाबरोबर भांडण झालं नाही. घटस्फोटाच्यावेळीही माझं भांडण झालं नाही. मी आणि माझ्या जवळच्यांना नेहमीच शांतता प्रिय आहे, अशी प्रतिक्रिया ऋतिकनं दिली आहे.