मला मार्केट व्हॅल्यूच नाही- अर्शद वारसी

अर्शद म्हणाला.... 

Updated: Jan 9, 2019, 07:43 AM IST
मला मार्केट व्हॅल्यूच नाही- अर्शद वारसी title=

मुंबई : कलाविश्वात विविध चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अनेक अभिनेत्यांना यशशिखरावर पोहोचण्याची इच्छा असते. त्यातील काहींच्या वाट्याला यश येतं, तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागतो. पण, काही मंडळी मात्र या अपयशानेही खचून न जाता आपल्या कामालाच प्राधान्य देतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अर्शद वारसी. 

'सर्किट' म्हणून तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. 'मुन्नाभाई', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'इश्कियाँ' या आणि अशा इतरही चित्रपटांतून भूमिका साकारत अर्शदने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं पण, तरीही आपली मार्केट व्हॅल्यू नसल्याचच त्याचं मत आहे. 

गेल्या काही काळापासून अर्शदचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही, त्यामुळे त्याला एका मुलाखतीत जेव्हा मार्केट व्हॅल्यूविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने आपलं स्पष्ट मत मांडलं. 'मला मार्केट व्हॅल्यू नसल्यामुळे या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. चित्रपट चालला किंवा चालला नाही, या गोष्टीचा मला काहीच फरक पडत नाही, कारण त्यामुळे माझ्या मार्केट व्हॅल्यूत चढ-उतार होतंच नाहीत. मुळात ती नसल्यामु़ळेच फारसा फरक पडत नाही', असं तो म्हणाला. 

आपण काम केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय काही चित्रपटांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपली निराशा झालेली नाही, असंही त्याने म्हटलं आहे. त्यामुळे जिथे मार्केट व्हॅल्यूच्या शर्यतीत अनेक कलाकार मंडळी बाजी मारण्यासाठी धडपड करत आहेत, तिथेच अर्शद मात्र त्याच्या कारकिर्दीवर आणि कामावर समाधानी असल्याचं कळत आहे. येत्या काळात अर्शद 'फ्रॉड सैय्या' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौरभ शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटातून तो झळकणार आहे.