छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंची पन्हाळ गडावरील ऐतिहासिक भेट

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून पाहता येणार तो ऐतिहासिक क्षण

Updated: Oct 20, 2018, 03:16 PM IST
छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंची पन्हाळ गडावरील ऐतिहासिक भेट title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हत, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा.

संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा काम झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका यशश्वीरित्या करत आहे. शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतून शंतनू मोघे आणि संभाजी महाराज्यांच्या भूमिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचाही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

संभाजी महाराज्यांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण प्रसंग आता या मालिकेतून आपल्यासमोर येणार आहे. दिलेर खानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पिता पुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील हे शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्वाची होती तेवढीच भावनिकदृष्ट्याही महत्वाची होती. लवकरच ही ऐतिहासिक घटना आपल्याला 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून पाहता येणार आहे.

या भेटीत शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यात काय चर्चा होणार? सोयराबाई संभाजी महाराजांना स्वीकारणार का? यापुढे दिल्ली आणि रायगडावरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार? हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि पन्हाळगडावरील या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार व्हायचे असेल तर मंगळवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २७ ऑक्टोबर या काळातील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचा एकही भाग पाहायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठीवर.