'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

Updated: May 17, 2018, 07:42 PM IST

बंगळुरू : कर्नाटकातील राजकीय नाट्यात सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या बोम्मई निकालाचा संदर्भ दिला जातो, तो निकाल लिहणाऱ्या माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं या संदर्भातील मतं महत्त्वपूर्ण आहे. 'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

राज्यपालांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या बोम्मई निर्णयाच्या विरुद्ध असल्याचा दावा पी. बी. सावंत यांनी या मुलाखतीत दिला आहे.  

कर्नाटकात भाजपची सत्ता स्थापन

कर्नाटकात निवडणूक निकालानंतर ४८ तासांच्या सत्ता संघर्षानंतर कर्नाटकात भाजपनं सत्ता स्थापन केलीय. बीएस येडियुरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेत. आता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा सरकारला १५ दिवसांची मुदत आहे. पदाचा भार स्वीकारल्यावर येडियुरप्पांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि जेडीएसला जनतेनं नाकारल्याचंही येडियुरप्पांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

देशात हुकूमशाही - राहुल गांधी

देशातल्या सगळ्या संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक भरले जातायत, असा आरोप राहुल गांधींनी केलाय... भाजप आणि संघाचे लोक हळूहळू न्यायालयांसह सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घेतायत, देशात गरिबांचा, दलितांचा आणि महिलांचा आवाज दाबला जातोय, असाही घणाघात राहुल गांधींनी केलाय...तर भारतातही पाकिस्तान आणि आफ्रिकेतल्या देशांसारखी हुकुमशाही निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप राहुल यांनी मोदींचं नाव न घेता केलाय.