'राहुल गांधींनी १०० वेळा प्रोटोकॉल मोडले'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याचे लोकसभेत तीव्र पडसाद उमटले.

Updated: Aug 8, 2017, 04:16 PM IST
'राहुल गांधींनी १०० वेळा प्रोटोकॉल मोडले' title=

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याचे लोकसभेत तीव्र पडसाद उमटले. काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात, मग गुजरातमध्येही दहशतवादी आले का ? असा सवाव काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. भाजपच्याच लोकांनी  दगडफेक केल्याचा आरोप खर्गे यांनी केला.

तर राहुल गांधी यांनी सुरक्षेचे नियम तो़डल्यामुळंच ही घटना घडल्याचा धावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. तसंच राहुल गांधी परदेशात जाताना एसपीजी का घेऊन जात नाहीत असा सवाल करत ते काही लपवत आहेत का असला पलटवार राजनाथ सिंग यांनी केला.

राहुल गांधींना एसपीजी सुरक्षा असल्यामुळे ते गुजरातमध्ये आल्यावर त्यांना चोख सुरक्षा व्यवस्था आणि बुलेटप्रूफ गाडी देण्यात आली होती. असं असतानाही राहुल गांधींनी बुलेटप्रूफ गाडी वापरली नसल्याचं राजनाथ म्हणाले. थावर हेलीपॅडवर उतरून राहुल गांधी बुलेटप्रूफ गाडीत बसण्यासाठी जात होते, पण त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकानं त्यांना दुसऱ्या गाडीतून जायला सांगितल्याचं राजनाथ लोकसभेत म्हणाले.

गुजरात दौऱ्यावेळी राहुल गांधींनी प्रोटोकॉल मोडले आणि जी ठिकाणं दौऱ्यात नव्हती तिकडेही गेल्याचा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. एवढच नाही तर १२१ दौऱ्यांमध्ये राहुल गांधींनी १०० वेळा प्रोटोकॉल मोडल्याचा खुलासाही राजनाथ सिंग यांनी केला.