शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग

राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत. 

Updated: Jun 16, 2017, 06:34 PM IST
शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग  title=

मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत. हा प्रस्ताव घेऊन रामदास आठवले यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली आहे. अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी रामदास आठवलेंनी शहांची भेट घेतली.

शरद पवार राष्ट्रपती झाले तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. शिवसेना पाठिंबा काढणार नाही. अनेक आमदार आपल्याला पाठिंबा देतील. कोणालाही राज्यात निवडणूक नकोय, असं मी अमित शहांना सांगितल्याचं रामदास आठवले म्हणालेत.

मोहन भागवत प्रणव मुखर्जींच्या भेटीला

दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून हालचालींना वेग आला आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आहे.

प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत या दोघांनी दुपारचं जेवणही एकत्रच केलं. राष्ट्रपती भवनामध्ये ही बैठक झाली आहे. राष्ट्रपती भवनाकडून मात्र, ही सहज बैठक असल्याचं सांगण्यात येतं असलं तरी त्यामुळे चर्चेचा विषय काय आहे? नेमकी कशासाठी आहे ही बैठक? याबाबत मोठी उत्सुकता अनेकांना लागून राहिलीय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.  

शिवसेनेनं सुचवलं स्वामिनाथन यांचं नाव

मोहन भागवत यांचं नाव या शर्यतीत मागे पडल्यानंतर शिवसेनेनं आणखी एका नावाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं ९१ वर्षीय कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष आणि हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामिनाथन यांच्या नावाला पाठिंबा दर्शवलाय.  

शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी राष्ट्रपती म्हणून भागवत नको असतील तर स्वामिनाथन हवेत, असा आपला आग्रह जाहीर केलाय. भाजप नेत्यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला आक्षेप असेल तर एम एस स्वामिनाथन यांच्या नावला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

रविवारी भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी, ते याबाबतीत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातंय.

काय म्हटलं राऊत यांनी...

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून मोहन भागवत यांना पहिली पसंती दिली गेली. परंतु, भाजपचा मोहन भागवत यांच्या नावाला विरोध असेल किंवा अडचणी असतील... तर शिवसेनेचा दुसरा पर्याय आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांचे तारणहार एम एस स्वामिनाथन... स्वामिनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. सध्या देशातील सर्वच शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी आग्रही आहे. त्यामुळे स्वामीनाथन यांनाच राष्ट्रपती केले तर देशातील शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय असेल... अशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे.