दुसऱ्या विवाहानंतरही जवानाच्या पत्नीला सुरू राहणार भत्ता

सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शहीदांच्या पत्नींना भत्ता मिळण्यासाठी सरकारनं कायद्यात काही बदल केलेत. 

Updated: Nov 21, 2017, 02:01 PM IST
दुसऱ्या विवाहानंतरही जवानाच्या पत्नीला सुरू राहणार भत्ता title=

नवी दिल्ली : सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शहीदांच्या पत्नींना भत्ता मिळण्यासाठी सरकारनं कायद्यात काही बदल केलेत. 

यापुढे सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जवानाच्या निधनानंतर विधवा पत्नीनं दुसरा विवाह केल्यानंतरही सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत जवानाच्या विधवा पत्नीनं दिवंगत पतीच्या भावासोबत दुसरा विवाह केला तरच हा भत्ता तिला मिळू शकत होता.   

संरक्षण मंत्रालयानं १९७२ मध्ये जाहीर केलेल्या एका आदेशानुसार वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जवानांना भत्ता दिला जातो. खुद्द पुरस्कार मिळवणाऱ्या जवानाला हा भत्ता दिला जातो आणि त्याच्या मृत्यूनंतर हा भत्ता त्याच्या विधवा पत्नीला मिळतो. ही पत्नी कायदेशीररित्या विवाहीत असायला हवी. आत्तापर्यंत विधवा पुनर्विवाह करेपर्यंत किंवा तिच्या मृत्यूपर्यंत तिला हा भत्ता दिला जात होता. 

भत्ता सुरू राहण्यासाठी पतीच्या भावासोबत विवाह करण्याची अट मागे घेण्यात यावी, अशी मागणी होत होती... या मुद्द्यावर विचार केल्यानंतर सरकारनं ही अट आता हटवलीय. यासाठी १६ नोव्हेंबर रोजी एक पत्र जाहीर करण्यात आलंय. यानुसार, भत्ता अगोदर वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्याला मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर विधवा पत्नीला हा भत्ता तिच्या मृत्यूपर्यंत मिळत राहील.