'उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर मुंबई थांबेल'

मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात.

Updated: Oct 7, 2018, 10:27 PM IST
'उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर मुंबई थांबेल' title=

नागपूर : मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केले नाही तर मुंबई थांबेल, असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेमध्ये निरुपम यांनी ही धमकी दिली आहे. तसंच विजय माल्याला पळवण्यामागे ७० कोटींची डील झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.

लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो... मुंबईला चालवतो... दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवतो. जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवले की आज कामावर जायचे नाही तर पूर्ण मंबई थांबेल असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

नागपूरात आयोजित उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आज अनेक उद्योगपती पळून जात आहेत. त्याच मालिकेत काही दिवसांनी अनिल अंबानी ही पळून जातील. एका कंपनीने अनिल अंबानींचे पासपोर्ट जप्त करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका ही दाखल केली आहे. विजय माल्याला देशातून पळवून लावण्यामागे भाजपने ७० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ही संजय निरुपम यांनी केला.

विजय माल्या आणि भाजपमध्ये ही डील करून देणाऱ्या भाजप नेत्यानेही २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गौप्यस्फोट निरुपम यांनी केला. मात्र, तो भाजप नेता कोण आहे त्याचा खुलासा निरुपम यांनी केला नाही.