ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार

 १० टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Updated: Jan 13, 2019, 10:39 AM IST
ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार  title=

कोल्हापूर : ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ आहे त्यांना जास्त जागा मिळाव्यात असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जागांचा विषय संपला असून केवळ ८ जागांचा निर्णय बाकी आहे. दोन्ही पक्ष यासंदर्भात चर्चा करणार असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर १० टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उमेदवार काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा असो तो निवडून येणे महत्त्वाचे आहे. दोन्ही पक्षाचे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत. ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ आहे त्यांना जास्त जागा मिळाव्यात आणि त्यानुसार बदल करावा ही लोकांची भावना असल्याचे ते म्हणाले.  मोदी सरकारने चार वर्षात काही केलं नाही, म्हणून आता धडधड निर्णय घेत आहे. आता एक एक निर्णय घेत आहेत पण लोक याला चुनवी जुमला मानत आहेत. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण तो कोर्टात टिकला नाही. 10 टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का? असा प्रश्न कायदेतज्ञ विचारत असल्याचे ते म्हणाले. संविधानाचा ढाचा बदलला जातो असं तज्ञ यांचं म्हणणं आहे. या आरक्षणामुळे जो मागे आहे तो मागेच राहील. ज्यांना ते आरक्षण हवे त्यांना ते मिळेल की नाही याबाबत शंका त्यांनी उपस्थित केली.

Gst संदर्भात मनमोहनसिंग यांनी विचार केला तसा विचार आताच्या सरकारने केला नाही. उपरती आल्यासारखे निर्णय सरकार घेत आहेत पण त्याचा फायदा होणार नाही असे पवार म्हणाले. साखर विकली नाही तर उसाचे पैसे कसे देणार ?.साखर कारखानदारानी एकरकमी पैसे द्यावेत अशी आंदोलकांचे म्हणणं आहे. साखर कारखाने टिकले पाहिजे यासंदर्भात शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्याकडे काही पर्याय असेल तर त्याचाही विचार केला पाहिजे पवारांनी सांगितले. 

मी 40 वर्षे झाली सिनेमा पहिला नाही पण उद्या बाळासाहेबांच्या संदर्भातला सिनेमा पाहणार असल्याचे पवारांनी सांगितले. यासोबतच सिनेमा पाहून लोक मतं टाकतात असे मला वाटतं नसल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.