आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Updated: Dec 7, 2018, 09:35 PM IST
आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून  title=

नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे. कांदा मार्केटमध्ये नेहमी १०० गाड्यांची आवक होते. मात्र, आता हीच आवक १५० गाड्यांवर गेली आहे. 

सध्या १५० ते २०० गाड्या कांदा एपीएमसीमध्ये दाखल होतेय. नाशिकमधील शेतकऱ्यांनी जुना कांदा बाहेर काढल्यानं ही आवक वाढलीय. आवक प्रचंड प्रमाणात वाढल्यानं एपीएमसीमध्ये १५०० टन कांदा पडून आहे. आवक जास्त असून उठाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली आहे. 

कांदा ठेवल्यानं सडण्यास सुरुवात झाली आहे. जुना कांदा ४ ते ५ रूपये किलो तर नवीन कांदा ७ ते ९ रूपये किलोनं विकला जातोय. यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होतेय. 

दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या गडगडणाऱ्या बाजारभावाने शेतकरी हैराण झाला असून उत्पादन खर्चही निघत नाही. यासाठी येवला तालुक्यातील पारेगाव येथील वैभव खिलारे या तरुण शेतकऱ्याने ट्रॅक्टरमधील सहा क्विंटल कांदा येवला बाजार समितीच्या बाहेर येवला-मनमाड रस्त्यावर ओतून दिला.