भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.

Updated: Jan 2, 2018, 11:33 AM IST
भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन title=

पुणे : भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

भीमा कोरेगाव प्रकरणा मागे पुण्यातील हिंदुत्व वादी संगठाणांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याची स्थानिक ग्रामस्थांची माहिती आहे. जे काही घडलं आहे त्याची चौकशी राज्य सरकार आणि पोलिसांनी करावी. घडलेला प्रकार चांगला नाही त्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यानी आगीत तेल टाकावे अशी भाषा करू नये, असे ते म्हणाले

एका तरूणाचा मृत्यु

समाजकंटकांनी घातलेल्या या राड्यात काहीजण जखमी झाले आहेत तर एका तरुणाचा मृत्यू झालाय. तसेच ३० ते ४० वाहनांचं नुकसान झालय. भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तिथे जमला होता. या पार्श्वभूमिवर नगर रोड परिसरात हा राडा झाला. 

अफवांवर विश्वास ठेऊ नये

रात्री उशिरापर्यंत परिसरात भितीचं तसेच तणावाचं वातावरण होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलिस बळ तैनात करण्यात आलय. सध्या त्याठिकाणी शांतता असून जनतेनं अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलय.

रामदास आठवलेंचे आवाहन

भिमा-कोरेगावमध्ये झालेल्या प्रकारानंतर राज्यभरात कमी अधिक प्रमाणात पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी संतप्त दोन्ही बाजूना सबुरीचं आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. एका विशिष्ठ समाजाच्या लोकांवर झालेला हल्ला निंदनीय असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणीही सामाजिक न्यायराज्यमंत्र्यांनी केली आहे. समाजकंटक मुद्दाम संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करीत असून हे षडयंत्र रोखण्यासाठी संतप्त समाजांनी शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन आठवले यांनी केलं आहे.