संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानंच विष पाजलं, वडिलांचा मृत्यू

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं परिसर सुन्न झालाय. 

Updated: Jun 16, 2018, 08:58 AM IST
संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानंच विष पाजलं, वडिलांचा मृत्यू title=
दुर्दैवी आई-वडील

लातूर : लातूरच्या मोरेनगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. संपत्तीच्या वादातून पोटच्या पोरानं आपल्या आई-वडिलांवर विषप्रयोगाचा कट रचला. या घटनेत वडिलांचा मृत्यू झालाय... तर सुदैवानं आई मात्र बचावलीय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक केलीय. 


आरोपी ज्ञानदीप कोटंबे

मोरेनगर भागातील रहिवासी असलेल्या कोटंबे कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होता... आई-वडिलांच्या पश्चात आपल्यालाच संपत्ती मिळणार या लालसेपोटी मुलगा ज्ञानदीप कोटंबे यानं आपल्या पालकांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्यानं आपल्या आई-वडिलांसाठी आणलेल्या नारळ पाण्यात विषारी औषध टाकून ठेवलं. 

हे नारळपाणी पिताच त्याची चव कडवट असल्याचं आई गयाबाई कोटंबे यांच्या लक्षात आलं... त्यांनी हे नारळपाणी पिणं टाळलं... परंतु, आपल्या पतीला याची जाणीव करून देईपर्यंत त्यांना उशीर झाला होता. साधुराम कोटंबे यांनी विषारी नारळपाणी पिऊन संपवलं होतं...

यानंतर गयाबाई यांनी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात धाव घेतली... परंतु, साधुराम यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही... गयाबाई यांच्यावर मात्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आरोपी ज्ञानदीप कोटंबेला पोलिसांनी अटक केलीय. लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झालीय. 

उल्लेखनीय म्हणजे, ज्ञानदीप याचं महिन्याभरापूर्वीच लग्न झालं होतं... मोठ्या थाटामाटात साधुराम-गयाबाई यांच्या आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं. पण, असा प्रसंग आपल्यावर येईल याची याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं परिसर सुन्न झालाय.