ठाणे आयुक्तांवर का आलीय उद्विग्नतेची परिस्थिती?

कर्तव्यतत्पर आयुक्त म्हणून ठाण्यात प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झालेत. अविश्वास ठराव आणून माझी बदली करा मी विरोध करणार नाही, असं जयस्वाल यांनी परवाच्या पालिका सर्वसाधारण सभेत म्हटलं. जयस्वालांवर ही वेळ का आली? याची कारणं शोधण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 22, 2018, 11:38 PM IST
ठाणे आयुक्तांवर का आलीय उद्विग्नतेची परिस्थिती? title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : कर्तव्यतत्पर आयुक्त म्हणून ठाण्यात प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झालेत. अविश्वास ठराव आणून माझी बदली करा मी विरोध करणार नाही, असं जयस्वाल यांनी परवाच्या पालिका सर्वसाधारण सभेत म्हटलं. जयस्वालांवर ही वेळ का आली? याची कारणं शोधण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न...

ठाण्यातलं राजकारण

ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या बदलीच्या भावनिक आवाहनानंतर आता ठाण्यात राजकारण तापू लागलंय. ठाण्याचे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे संजीव जयस्वाल यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिंदे-जयस्वाल यांच्या मैत्रीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल अशी भीती भाजपला वाटू लागलीय. म्हणूनच विरोधी बाकांवर बसलेले भाजप नगरसेवक आयुक्तांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलाय.

जयस्वाल हुकूमशाह?

तर आयुक्त हुकूमशाहीप्रमाणे काम करतात. त्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करत आहोत असे भाजप गटनेते मिलिंद पाटणकर यांनी म्हटलंय.

ठाण्याचं भलं होत असेल तर नेहमीच आयुक्तांना पाठिंबा देऊ, असं विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी म्हटलंय. ठाणेकर जनताही आयुक्तांच्या धडाकेबाज कामावर खूश असून त्यांनी विकासाची काम करत राहवीत, अशी त्यांची इच्छा आहे.

ठाण्यातली विकासकामं

गेल्या तीन वर्षात ठाण्याचा चेहरा मोहरा पालटलाय. संजीव जयस्वालांची कामांमधली भूमिका त्याच्या टीकाकारांनाही मान्य आहे. रस्ते रुंदीकरण, रुंदीकरणग्रस्तांची तातडीनं पर्यायी व्यवस्था, वाहतूक कोंडी मुक्त ठाण्यासाठी विशेष प्रयत्न, कल्स्टर डेव्हलपमेंट, ठाण्याच्या पूर्वेकडचा सॅटीस... असे एक ना अनेक प्रकल्प जयस्वालांनी मार्गी लावलेत.

कर्तव्यदक्ष अधिकारी आणि राजकारणी यांचं विळ्याभोपळयाचं नातं नेहमीच समोर येत असतं. इतर ठिकाणी भ्रष्टाचाराचाला चाप हे प्रमुख कारण असतं. इथे ठाण्यात मात्र विकास कामं आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता हे जयस्वालांच्या उद्विगनतेचं कारण असल्याची चर्चा सध्या ठाण्यात रंगतेय...