मराठी माणूस फुटणार नाही, याची काळजी घ्या- मनोहर जोशी

मराठा आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी.

Updated: Jul 22, 2018, 08:18 PM IST
मराठी माणूस फुटणार नाही, याची काळजी घ्या- मनोहर जोशी title=

मुंबई: सरकारने मराठा समाजाच्या मागण्या नीटपणे समजवून घ्याव्यात आणि सोडवाव्यात. हे करताना मराठी माणूस फुटणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केला आहे. मराठा समाजाच्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला पंढपुरात विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, असा पर्यायही मनोहर जोशींनी सुचवला आहे.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीला विठुरायाच्या दर्शनाला न जाण्यामागची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. गेल्या तीन वर्षापासून मी आषाढी पूजेला जातो. पण काही संघटनांनी जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत मेगा भरती रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पण दहा लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने मी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.