भाजप ! माफी मागितली, खरंच विषय असा संपतो का?

महाराष्ट्राच्या पोरीबाळींबद्दल असभ्य भाषा करणाऱ्या राम कदम हे अजून मोकाटच आहेत.

Updated: Sep 8, 2018, 03:45 PM IST
भाजप ! माफी मागितली, खरंच विषय असा संपतो का?   title=

मुंबई : महाराष्ट्राच्या पोरीबाळींबद्दल असभ्य भाषा करणाऱ्या राम कदम हे अजून मोकाटच आहेत. कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. भाजपचे सगळे नेते त्यावर तीन दिवस मूग गिळून गप्प बसले आणि आज म्हणतात माफी मागितली, विषय संपला. खरंच विषय असा संपतो ?  

दहीहंडीच्या दिवशी भाजपच्या रामानं नवं महाभारत घडवलं. लग्नासाठी लेकीबाळींना पळवून आणण्याची असभ्य, अश्लाघ्य भाषा केली आणि अवघा महाराष्ट्र पेटून उठला. इतकं सगळं होऊनही राम कदमांनी व्यक्त केली फक्त दिलगिरी. प्रकरण फारच तापल्यावर माफीनाम्याची उपरती झाली. एक आमदार महिलांचा धडधडीत अपमान करतो आणि त्याविरोधात भाजपचे नेते अवाक्षर काढत नाहीत. तीन दिवसांनी चंद्रकांत दादा म्हणतात, माफी मागितली विषय संपला.

राम कदमांबाबत विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोडले हात

राम कदमांबाबत विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोडले हात

 

विषय संपला. असा विषय संपतो. ? तुमचा आमदार मुलींना पळवून आणण्याबद्दल बोलतो.. त्यावर पार्टी विथ डिफरन्समधले सगळेच्या सगळे तीन दिवस मूग गिळून गप्प बसता. राम कदमांवर कारवाई करायचं तर सोडूनच द्या, वर म्हणता विषय संपला. धडधडीत राम कदमांचं वक्तव्य समोर असताना आणखी कसले पुरावे हवेत ?

चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण

चंद्रकांत पाटलांकडून राम कदमांची पाठराखण

फक्त प्रवक्तेपद स्थगित करुन विषय संपतो का ? राम कदमांवर गुन्हा का दाखल झाला नाही ? राम कदमांची पक्षातून हकालपट्टी का झाली नाही ? भाजपचा एकही नेता राम कदमांविरोधात का बोलत नाही ? मुख्यमंत्री इतके दिवस गप्प का? चार दिवस उलटूनही राम कदम मोकाट का ? या रामाला अभय कुणाचं ?

विनोद तावडे प्रसारमाध्यमांवरच घसरलेत..

प्रसारमाध्यमांमुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी- विनोद तावडे

महाराष्ट्राच्या लेकीबाळींना हीन लेखणाऱ्या आणि त्यांना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या अशा रामाला वनवासात पाठवण्याऐवजी त्याला पाठिशी घालून भाजप नेमका काय संदेश देतंय ?  असं करुन पार्टी विथ डिफरन्स म्हणण्याचा अधिकार भाजपकजडे राहील का ?