मुंबई: विहिरीचा कठडा कोसळून महिला पडल्या विहिरीत; तिघांचा मृत्यू

धार्मिक कार्यासाठी या महिला विहिरीवर जमल्या होत्या.

Updated: Oct 2, 2018, 08:41 PM IST
मुंबई: विहिरीचा कठडा कोसळून महिला पडल्या विहिरीत; तिघांचा मृत्यू title=

मुंबई: विलेपार्ले परिसरात मंगळवारी संध्याकाळी कठडा तुटून काही महिला विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. फिरोजशहा मेहता मार्गावरील रूईया बंगल्याच्या आवारात हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, जितीया या धार्मिक पूजेसाठी कुंकूवाडी परिसरातील महिला विहिरीवर जमल्या होत्या.  यावेळी विहिरीच्या कठड्यावरही अनेकजण बसले होते. कठड्यावर भार आल्याने ही दुर्घटना घडल्याचेही सांगण्यात येत आहे. 

या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत विहिरीतून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे समजते. माधवी विजय पांडे (४९), दिव्या (३) आणि रेणू उदीलाल यादव (२०) अशी मृतांची नावे आहेत. 

विहिरीत आणखी काही महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंधार पडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मात्र, फ्लडलाईटस लावून स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान उर्वरित महिलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. जखमी महिलांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.