खडसेंची चौकशी कधी संपेल हे मुख्यमंत्रीच सांगतील-दानवे

खडसे साहेबांना पदापासून दूर करण्याची मागणी करणारे, काँग्रेस राष्ट्रवादीवालेच होते

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 25, 2018, 09:05 PM IST

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे चौकशीतून बाहेर पडल्यानंतर, त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, यानंतर एकनाथ खडसे यांना तोच सन्मान दिला जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर बोलताना सांगितलं. मात्र एकनाथ खडसे यांची चौकशी कधीपूर्ण होईल ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

विरोधकांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही-दानवे

एकनाथ खडसे हे भाजपचे आदरणीय नेते आहेत, त्यांना कान लावणाऱ्यांनीच त्यांच्यावर आरोप केले आणि खडसे साहेबांना पदापासून दूर करण्याची मागणी करणारे, काँग्रेस राष्ट्रवादीवालेच होते, तसेच असाही एक काळ होता की, एकनाथ खडसे विरोधी पक्षनेतेपदी असताना, काँग्रेस राष्ट्रवादीचे कारनामे त्यांनी सर्वांसमोर आणले होते, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

चौकशीच्या दिरंगाईने खडसे अधिक अस्वस्थ

तसेच एकनाथ खडसे यांच्या चौकशीत फार दिरंगाई होत आहे, असं दिसून येत आहे. यामुळे एकनाथ खडसे अस्वस्थ आहेत, एकनाथ खडसे यांनी मतदारसंघातील सर्वांच्या पुन्हा भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे.