...त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलावीत: शिवसेना

....

Updated: Jun 19, 2018, 08:17 AM IST
...त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलावीत: शिवसेना title=

मुंबई:  'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचे कारस्थान रचले आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई केले याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे', असा सज्जड इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी 'यापुढे शिवसेनाच!' या मथळ्याचा लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी शिवसेनेचा इतिहास, वर्तमानकाळ आणि भविष्याबाबत धांडोळा घेतला आहे. दरम्यान, यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि विरोधकांवरही कडाडून हल्ला चढवला आहे. राजधानी मुंबईबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना ठाकरे यांनी काहीशा तीव्र शब्दांचा वापर केलेला लेखात पहायला मिळते.

अडचणींच्या डोंगरातील दगडांपासून कार्याची स्मारके होतील

'शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे', असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

'शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. अर्थात तो नेहमीप्रमाणे दणक्यातच साजरा होईल. ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना एका प्रतिकूल परिस्थितीत झाली. त्यानंतरही असंख्य खाचखळग्यातून, काटय़ाकुटय़ांतून शिवसेनेचा प्रवास झाला आणि त्यावर यशस्वी मात करीत शिवसेना आजच्या शिखरावर पोहोचली आहे. तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. कोणत्याही धनदांडग्यांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेने भगव्याचे तेज विश्वभरात झळाळून सोडले. ‘भगवा’ हाच हिंदुत्वाचा रक्षक यावर आता कुणाचेही दुमत नाही. तो ‘भगवा’ म्हणजे भेसळीचा नसून शिवरायांचा म्हणजेच शिवसेनेचा, यावर देशाने मोहोर उठवली आहे. शिवसेना नक्की काय व कसे करणार? असे प्रश्न तेव्हा ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या, पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर का जात आहे, याचा अभ्यास आमच्या विरोधकांनी करायचा आहे', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

२०१४ चा राजकीय अपघात २०१९ सालात होणार नाही

दरम्यान, लेखात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावही टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना ठाकरे म्हणतात, 'देशाचे वातावरण बदलत आहे. २०१४ चा राजकीय अपघात २०१९ सालात होणार नाही. सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे.'