Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

‘शेजार’वैर नाही फायद्याचं! निवृत्त ब्रिगेडियर. हेमंत महाजन

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमा आणखी असुरक्षित बनल्या आहेत. आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंध टिकवणे महत्त्वाचे आहे. चीनचा प्रभाव श्रीलंकेत वाढत आहे. २०१२ मध्ये तेथील हंबनतोटा या बंदराच्या विकासाचे आणि विमानतळाचे काम चीनला मिळाले आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंध टिकवणे महत्वाचे आहे. असे न केल्यास आपण त्या राष्ट्राना चीनच्या जवळ लोटीत आहोत याचे भान आपल्या राजकीय नेत्यांना उरलेले नाही. आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न भारताकडून नेहमीच केला जातो; पण विस्तारवादी वृत्तीच्या चीनकडून त्यामध्ये अडथळे आणले जातात.

नेपाळमध्ये भारतविरोधी कारवाया
नेपाळमध्ये सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया काय अधोरेखित करतात? नेपाळमधील माओवादी चीनच्या पदराआड लपून भारताकडे डोळे वटारून बघत आहेत. नेपाळमध्ये हिंदी, हिंदू आणि भारतीय उद्योगपती-व्यापाऱ्यांविरुद्ध द्वेष पसरविण्याचे कारस्थान रचले जात आहे. या साऱ्या प्रकारामागे चीनचा हात आहे. नेपाळमध्ये भारतीय सीमेपर्यंत रस्ते आणि रेल्वेमार्गाचे जाळे विणून सर्व बाजूंनी भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. या घडामोडींकडे भारत सरकार दुर्लक्ष का करीत आहे?

भारत-बांग्लादेश संबंध सुधारले पण घुसखोरी सुरुच
खालिदा झिया पंतप्रधानपदी असताना (२००१ ते २००६) संबंधात दुरावा आला होता, परंतू २००९ पासून श्रीमती हसिना वाजेद सत्तेवर आल्यापासून वातावरण बदलले. भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना आवर घालण्याचे काम त्यांनी केले. खालिदा झिया यांच्या कारकिर्दीत टाटा कंपनीच्या तीन अब्ज डॉलरच्या नैसर्गिक वायू निर्यात प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. आता अनेक प्रकल्प सुरु होणार आहे. हसिना वाजेद यांनी चीनला भेट दिल्यावर तत्काळ चीनच्या नेत्यांनीही ढाक्याला भेट देऊन मैत्री वाढविली. डॉ. सिंग यांनीही ढाक्यास भेट देणे गरजेचे आहे. बांगलादेशात आजही सुमारे तीन हजार दहशतवादी व दहशतवाद्यांच्या १२० संघटना आहेत. ब्रह्मपुत्रा नदीतील सीमानिश्चितीच्या संदर्भात वारंवार चर्चा सुरू असते. महानंदा, कारातोआ, नागर, कुलिक, अत्राय, धारला व फेनी या नद्यांतील तंट्यांचे प्रश्न सोडविण्याचे ठरले आहे. ‘सीमेवरील व्यापार वाढविण्यासाठी १० हाट (बाजार) सुरू करण्यावर एकमत झाले आहे. बाकी प्रगती होत आहे. पण अनेक वर्षे भारतात बेकायदारीत्या येणाऱ्या बांगलादेशियांचा प्रश्न ईशान्य राज्यात बिकट बनला आहे. बांग्लादेश सीमा पार करून आतापर्यंत चार कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. हे घुसखोर परत पाठवायची राजकिय इच्छाशक्ती नाही. बांग्लादेशाच्या भूमीवर शिजणारे भारतविरोधी कारस्थाने थांबविण्यासाठी, बांग्लादेशींची बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी पावले टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. बेकायदा बांगला स्थलांतरितांमुळे ईशान्य भारतातील लोकसंख्येचे संतुलन ढळले आहे.
‘शेजार’वैर नाही फायद्याचं!

भूतान, भारताचा मित्र की चीनचा?
आज भूतानचे भारताशी जेवढे प्रदीर्घ काळ घनिष्ट संबंध आहेत तेवढे ते अन्य कोणत्याही देशाशी नाहीत. हे खरे असले तरी त्यामुळे भारताने गाफील राहावे, अशी परिस्थिती अर्थातच नाही. सीमा सुरक्षेपासून रस्ते बांधणीपर्यंत आणि आरोग्यापासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांत भूतान फार मोठ्या प्रमाणात भारतीय सहकार्यावरच अवलंबून आहे. जून २०१२ मध्ये रिओ येथे झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भूतानचे पंतप्रधान जिग्मी थिनले आणि चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांची भेट झाली. ही घटना विशेष उल्लेखनीय म्हणायला हवी. भारताच्या शेजारी देशांमध्ये एक भूतानच असा आहे की जिथे चीनची उपस्थिती नाही! भूतान-चीन संबंधांमुळे ही परिस्थिती बदलेल. चीनने नानाविध प्रलोभने दाखविली आहे याला भूतान बळी पडेल का?

सशस्त्र दहशतवाद्यांची घुसखोरी व शस्त्रांची तस्करी, ‘नॉन-स्टेट अक्टर्सचा झालेला उदय, नार्कोटिकल व शस्त्रांच्या तस्करांचे असलेले लागेबांधे, घुसखोर, डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा वाढणारा दहशतवाद, फुटीरतावादी चळवळींना मदत पुरविणारे व पोसणारी बाह्यकेंद्री सत्तावर्तुळे, सीमेलगत मदरशांची वाढणारी संख्या यांमुळे सीमा व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यामुळे सीमा संरक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अंमली पदार्थांचे तस्कर व भरपूर पैसा हाती असलेले दहशतवादी यांनी निम्नस्तरातील राजकीय नेते, पोलीस, स्थानिक लोकांशी सूत जुळविलेले असते. शेजारी राष्ट्रांशी संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानाचा सीमा सुरक्षतेशी निकटचा संबंध आहे. जगातील सर्वात दुर्गम अशा भागांतील सीमेबाबत भारताचे चीन व पाकिस्तानशी असलेले वाद व अन्य सीमाप्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता सीमा सुरक्षा हे २०१३ मध्ये अतिशय कार्यक्षम व प्रभावी असणे गरजेचे झाले आहे.


First Published: Wednesday, January 09, 2013, 15:56

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: