आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना

Updated: Nov 30, 2015, 09:02 PM IST
आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना title=

हेमंत महाजन / फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. ‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता. 

जागतिक महासत्तांनी आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या प्रकारांचे दहशतवादी भस्मासूर जन्माला घातले, त्यांना पोसले आणि आपल्या स्वार्थासाठी या दहशतवाद्यांचा वापर सुद्धा केला. मात्र आता हेच दहशतवादी भस्मासूराप्रमाणे खुद्द आपल्या जन्मदात्या देशांच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाले तेव्हा हे दहशतवाद्यांचे जन्मदाते आता ओरडू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या सर्वात मोठा पोशिंदा पाकिस्तानकडे सुद्धा आपला तिसरा डोळा उघडून या देशांनी बघितलेच पाहिजे.

आयसिसचा भारताला धोका आहे का?

भारतातील काही मुस्लिम तरुण आयसिसकडे आकर्षित होत आहेत. तरुणांना त्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे.पूर्वी आपल्याकडील भरकटलेल्या तरुणाईला नक्षलवाद, माओवाद, लष्कर-ए-तय्यबा, हुर्रियत, सिमी, इंडियन मुजाहिदीन, तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-दावा आदी संघटना आणि त्यांचे आचार-विचार आकृष्ट करीत असत. पण आता युवावर्ग आयसिसच्याच्या नादी लागत आहे.

आयसिसच्या कारवायांना आळा घालायचा असेल तर त्यांची आर्थिक आणि मनुष्यबळाची रसद तोडणे हे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आयसिसला जिहादी मिळतात तरी कसे या विषयाच्या मुळाशी जाऊन भिडायला हवे. त्यांची मोडस ऑपरेंडी समजावून घ्यायला हवी.

भारतातील  १५० हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात

आयसिसचे हिंसाचाराचे क्रौर्यदेखील भरकटलेल्या तरुणाईला आवडत आहे. भारतातील  १५० हून अधिक तरुण या संघटनेच्या संपर्कात आहे. ३३ भारतीय तरुण आयसिसच्या टोळीत सामील झाले असून, त्यांनी जिहाद पुकारला आहे. यातील ६ जण हिंसाचारात मारले गेले, तर मुंब्रा येथील एक युवक माघारी परतला आहे. आयसिसकडून लढणार्‍या भारतीय युवकांमध्ये कल्याणचे दोन, ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेला एक काश्मिरी, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील प्रत्येकी एक तसेच ओमान आणि सिंगापूर येथील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे. मध्यंतरी एक भारतीय युवतीसुद्धा आयसिससाठी काम करण्यास तयार झाली होती.पण तिचा डाव भारतीय सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडला.युवकांचा हा आकडा फार मोठा नसला तरी प्राण हातावर घेऊन मुस्लिमेतरांविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेमागे कोण, याची मुळातून चौकशी होण्याची गरज आहे.आयसिसमधल्या काहींना परत आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे.अनेक शिया युवकांना आयसिसविरुध्द लढाईत सामिल व्ह्यायचे होते. पण त्यांना वेळीच थांबवले गेले. भारत सरकार आयसिसवर नजर ठेऊन आहे. यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळाले आहे.

संशयित सुरक्षा दलाच्या देखरेखेखाली

सध्या एनआयए/ गुप्तचर यंत्रणा याचे विश्लेषण करण्यात गुंतली आहे. या तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी आयसिसने मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्यातही खास करून फेसबुक आणि ट्वीटर. त्या खालोखाल वापर झाला आहे तो यूटय़ूब आणि ई-मेल्सचा. यामधून तरुणांना प्रक्षोभक माहिती पुरविण्यात आली. यूटय़ूबवर अतिशय प्रक्षोभक असे व्हिडीओज टाकण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांच्या क्षेत्रात भारताने घेतलेली भरारी आयसिसवाद्यांच्या प्रगतीआड येत आहे. त्यातूनच भारतीय गुप्तचर संस्थांनी १५० भारतीयांच्या आयसिसच्या संपर्कयात्रेचा भांडाफोड केला आहे. या सार्‍यांना सुरक्षा दलांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. 

‘डी रॅडिकलायझेशन’ व ‘सोशल आऊटरीच’

गेली अनेक वर्षे मुस्लिम तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असलेली धर्माधता लक्षात घेता त्याला त्यापासून परावृत्त करण्याचेही प्रयत्न मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. हे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तुरुंगाधारित आणि समाजाधारित. तुरुंगातील अशा तरुणांची कट्टर मने वळविणे ही कसरत आहे. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र पोलिसांनीही अशी कार्यशाळा आयोजित केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कार्यशाळांना‘डी रॅडिकलायझेशन’असे संबोधण्यापेक्षा ‘सोशल आऊटरीच’ असे म्हणणे योग्य ठरेल, असे नमूद करून या प्रयत्नांना जोरदार पाठिंबा दिला.या पार्श्‍वभूमीवर मला काय त्याचे, असा विचार करून चालणार नाही. प्रत्येक सजग भारतीयाने सावधपणे आपल्या वस्तीतील कोणते कुटुंब, कोणती व्यक्ती अशा कारवायांमध्ये गुंतली आहे का, यावर डोळ्यात तेल घालून पाहणी केली पाहिजे. एकही भारतीय युवक आयसिसच्या जाळ्यात अडकणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.भविष्यात आपल्या देशात हे टाळायचे असेल तर पालकांचा मुलांशी असलेला सततचा संवाद महत्त्वाचा असणार आहे. सध्या हा संवाद कमी झाला आहे.

कामगारांवर करडी नजर ठेवणे आवश्यक

मोठय़ा प्रमाणात होत असलेले ऑनलाइन धर्माधनुकरण आणि मध्य-पूर्व देशात मोठय़ा संख्येने कामगार म्हणून वावरणारे असंख्य मुस्लीम तरुण यांवर आयसिसची भर असण्याची शक्यता आहे. इराकमध्ये १८ हजार भारतीय कामगार असल्याचे भारताबाहेरील परराष्ट्रविषयक खात्याच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. यापैकी काही धर्माधनुकरण होऊन भारतात परतले तर ते धोकादायक ठरणार आहे. आयसिसचा धोका टाळण्यासाठी अशा कामगारांवर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे.

भारताने काय करावे

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत फारसे भारतीय यापूर्वी कधी दिसत नव्हते. आयसिसमुळे चित्र बदलतंय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातल्या सगळ्या घटकांनी जागृत राहण्याची गरज आहे. इंटरनेटवरील प्रचाराला आळा घालण्याची मोहीम सुरू झाली असली, तरी डिजिटल रणभूमीवर आजमितीला तरी आयसिसचाच वरचष्मा आहे.

दहशतवादी इंटरनेटच्या सहाय्याने टेररिझम निर्माण करू शकतात तर त्याच इंटरनेटचा उपयोग करून आपणच आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत बनवली पाहिजे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना जरब तर बसेलच, परंतू काट्यानेच काटा काढल्यासारखे होईल.  खालील उपाय करून आपण त्यावर यश मिळवू शकतो.

प्रचार करणारे भारताच्या बाहेरचे इंटरनेट साईट,सोशल नेटवर्किंग साईट ब्लॉक केले पाहिजे. भारतामधल्या आयसिस समर्थकांच्या साईट्स, फेसबुक,ट्विटर अकाऊंट धारकांना लगेच पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. पूर्ण ब्लॉग डोमेनवर  बंदी घालण्यात यावी. इंटरनेट ट्रॅफिक सतत मॉनिटर करावे. ते करण्यासाठी अनेक सोयी/(SOFT WARES) सध्या उपलब्ध आहेत. सायबर सेक्युरिटी विभाग जास्त मजबूत करावा. पोलिसांना फॉरेन्सिकचे योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. कम्प्युटर तज्ज्ञांच्या मदतीने ईमेल किंवा ब्लॉगवरील मजूकर कुठून आले, कोणी पाठवले हे शोधून काढत रहावे.

भारतात इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांनी  दहशतवादी साईट, फ़ेसबुक,ट्विटर अकाऊंट,आढळल्यास ही माहिती लगेच पोलीस सायबर सेलला द्यावी. देशभक्त नागरिकांनी पोलिसांचे कान आणि डोळे बनावे. सर्वानी मदत केली तरच आपण आयसिसच्या दहशतवादाचा मुकाबला करु शकतो.

दहशतवादाविरुद्ध सर्वसमावेशक व्यापक धोरण आवश्यक

२६/११चा अतिरेकी हल्ला मुंबईत झाला होता. त्यानंतर अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय  सरकारने घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र या उपाययोजना कागदोपत्रीच आहे. पोलिसांसाठी अत्याधुनिक शस्त्रे, लष्करी गाड्या, घेण्यात आल्या. सागरी सुरक्षेसाठी अनेक स्वतंत्र पोलीसचौकी निर्माण करण्यात आल्या. तटरक्षक दलाच्या मदतीसाठी पोलिसांनाही गस्ता नौका पुरवण्यात आल्या. पण आज यातील अर्ध्या नौका बंद आहेत. सागरी चौक्या ओस पडल्या आहेत.

दहशतवादाचा सर्वाधिक धोका असणार्‍या इस्राईल या देशाने स्वत: भोवती जे सुरक्षाकवच उभारले आहे त्याचा अवलंब जगातील सर्वच शहरांना करावा लागणार आहे. इस्राईलच्या जेरूसलेम आणि अन्य शहरांवर दहशतवादाचे सतत सावट असते. त्यांची नजर असते ती शहरभर बसवलेल्या कॅमेऱ्यातून. कुठेही वाजवीपेक्षा अधिक वेगाने वाहन जात असेल. चुकीच्या बाजूने एखादे वाहन पुढे सरकत असेल वा पळापळ झाल्याचे चित्र कॅमेर्‍यात टिपले जाताच अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेद्वारे तत्काळ धोक्याचा इशारा दिला जातो.

पोलीस दलाचं सक्षमीकरण, सागरी सुरक्षा आणि गुप्तवार्ता विभागाची पुनर्बांधणी या महत्त्वाच्या बाबींकडे अधिक भर देणे गरजेचे आहे. 2008 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणात समन्वय राखण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचे ठरले होते ते अद्याप झालेले नाही. दरवर्षी राज्यातील सर्व प्रमुख शहरांचे सुरक्षा ऑडिट होणे आवश्यक आहे. तेथील स्थिती, महत्त्वाची ठिकाणे, मध्यंतरीच्या काळात जगभरात घडलेल्या घटनांचा विचार करून त्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहेत.

दहशतवादाविरुद्ध लढाई ही स्वत:पुरतीच

दुर्दैवाने पाश्‍चिमात्त्य देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुहेरी मापदंड अवलंबत आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताने अनेक वेळा भक्कम पुरावे दिल्यानंतरही अमेरिकेने त्याकडे डोळेझाक केली. अमेरिकेकडून पाकिस्तानला जी आर्थिक मदत केली जाते, त्यातूनच पाकचे सरकार अतिरेकी संघटनांना पैसा, शस्त्र आणि दारुगोळा पुरवते.

पाकिस्तानसारखी राष्ट्रेसुद्धा अशा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतात तेव्हा हसू येते. पाकिस्तान दहशतवादाची जागतिक कंपनी आहे. हे सत्य सगळ्यांनी स्वीकारायला हवे, पण जोपर्यंत स्वत:च्या खुर्चीखाली बॉम्ब फुटत नाहीत तोपर्यंत अमेरिका व युरोपियन राष्ट्रांना भारताची तडफड समजणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढाई ही स्वत:पुरतीच असते. भारतानेदेखील हे सत्य स्वीकारले पाहिजे. दहशतवादाविरुद्ध ही लढाई आपल्याला स्वतंत्ररित्या लढावी लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.