खरे शिवाजी महाराज- परदेशी नजरेतून

मराठा साम्राज्याचे जागतिक किर्तीचे इतिहास संशोधक डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांच्या  व्याख्यानासाठी दरबार हॉल भरलेला होता. स्टुअर्ट गॉर्डन म्हणजे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील सेंटर फ़र साऊथ एशियन स्टडीज विभागातले सिनियर रिसर्च स्कॉलर, आशिया आणि जगाच्या इतिहासावरची त्यांची पुस्तके जगभर गाजली.

Updated: Feb 20, 2015, 10:27 PM IST


प्रकाश दांडगे आणि डॉ. स्टुअर्ट गॉर्डन

प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई  : मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचा दरबार हॉल.

मराठा साम्राज्याचे जागतिक किर्तीचे इतिहास संशोधक डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांच्या  व्याख्यानासाठी दरबार हॉल भरलेला होता. स्टुअर्ट गॉर्डन म्हणजे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील सेंटर फ़र साऊथ एशियन स्टडीज विभागातले सिनियर रिसर्च स्कॉलर, आशिया आणि जगाच्या इतिहासावरची त्यांची पुस्तके जगभर गाजली. मराठयांच्या इतिहासाबरोबरच आशिया, युरोप, मध्य-पूर्वेचा इतिहास हा त्यांचा खास अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय. .

सौम्य प्रवृत्तीचे डॉ. गॉर्डन याचं अभ्यासपूर्ण भाषण संपले.. मराठयांच्या इतिहासातले अनोखे पैलू त्यांनी उलगडून दाखवले. माझ्या हातात डॉ. गॉर्डन याचं मराठयांच्या इतिहासावरचं गाजलेलं पुस्तक होते. THE New  Cambridge Hisoty of India या मालेतलं The Marathas 1600-1818 या पुस्तकावर सह्या घेण्यासाठी त्यांच्याभोवती इतिहास प्रेमींची गर्दी झाली होती.. डॉ, गॉर्डन यांना भेटण्याची उत्सुकता हे पुस्तक वाचल्यापासून होती. ती डॉ, गॉर्डन यांच्या मुंबई भेटीनं पूर्ण झाली.

इतिहासाकडे घडून गेलेल्या घटनांचा वस्तुनिष्ठ अभ्यास या दृष्टीने पहायला हवं असं डॉ. गॉर्डन यांना वाटतं.

मराठयांच्या इतिहासचं एक वेगळचं दर्शन डॉ. गॉर्डन यांच्या पुस्तकातून होते. खास करुन शिवाजी महाराजांचे जे दर्शन त्यांच्या पुस्तकातून होतं ते थक्क करणारे आहे. शिवाजी महाराजांबद्दल सत्य इतिहास समोर येणे गरजेचं आहे हे  गॉर्डन यांच्या संशोधनातून  वारंवार  जाणवते. शिवाजी महाराजांना हिंदवी राष्ट्र स्थापन करायचे होते का ?


डॉ. स्टुअर्ट गॉर्डन याचे मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तक

The Marathas 1600-1888 या पुस्तकात 65 व्या पानावर डॉ. गॉर्डन  लिहितात – “Let us pause to consider the sort of polity that Shivaji was carving out in the Pune  Region. Many of the major writers on the subject would have us believe that Shivaji was creating a Hindu state, something fundamentally different and in opposition to the Muslim states that surrounded  it. The Brahmin historians of the twentieth century, starting with Rajwade, especially wanted to prove that Shivaji was guided by Brahmin advisors from early in his life, as that he had a vision of state based something called Maharashtra Dharma. Much of this, if not all, has been shown by later research to be an artifact of the researchers, not a fact of the period.”

वाचलतं गॉर्डन काय म्हणतात ते ?  शिवाजी महाराज हे एक हिंदू राजे होते आणि त्यांना धर्मावर आधारित राज्य स्थापन करायचं असं काही इतिहासकाराचं म्हणणं सत्याला धरुन नाही असं डॉ. ग़ॉर्डन या इतिहास संशोधकानं आपल्या पुस्तकात  स्पष्ट केलं आहे !

.याच पुस्तकात रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांच्या संबंधावर तसेच शिवाजी महाराजांचे मुस्लिमांशी कसे संबध होते यावरही डॉ. गॉर्डन यांनी प्रकाश टाकला आहे. शिवाजी महाराजांबद्दल पान क्रमांक 66 वर डॉ, गॉर्डन लिहितात, “There is no concrete evidence that he surrounded  himself with Brahmin advisors; to the contrary, recent evidence has shown that he did not meet the main candidate  for the role of advisor, Ramdas, until 1672. Finally , there is considerable evidence of the Muslims that Shivaji  welcomed  into his state from the earliest  times. For example, the court proceedings of 1657 list the names of the Muslim qazis (judges) who were on the salary to adjudicate cases. At the same time, Shivaji welcomed Muslim recruits into his army. The first unit was a group of 700 Pathans, who had left Bijapur after the treaty with the Mughals. Individual muslims also rose high in Shivaji’s army, such as Sidi Ibrahim, who was one of the ten trusted commanders at the confrontation with Afzal Khan or Nurkhan Beg, who was Shivaji’s sarnobat at the time.”

म्हणजेच काय रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट 1672 ला झाली. त्यावेळी शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज म्हणून आणि रामदास स्वामी हे रामदास स्वामी म्हणून ओळखले जात होते असा त्याचा अर्थ होतो. शिवाजी महाराज हे सगळ्या धर्मातल्या लोकांना  घेऊन राज्य उभारणीच्या कार्याला लागले होते. धर्माच्या आधारावर ते आपल्या सहका-यांमध्ये भेदभाव करत नव्हते तर फक्त कर्तृत्वावर आणि निष्ठेवर माणसांना योग्य संधी देत प्रजेचं कल्याण आणि रक्षण करत होते हे  स्पष्ट होतं...

सगळ्या धर्मांचा आदर करणारे रयतेचं कल्याण करणारे असे शिवाजी महाराज होते हे गॉर्डन यांच्या पुस्तकातून समोर येते. युरोप, अमेरिकेच्या इतिहासापेक्षा आशियाच्या आणि खास करुन भारताचा आणि मराठयांचा इतिहासाचा अभ्यास करावा यासाठी डॉ. गॉर्डन यांना त्यांच्या प्राध्यापकांनी प्रवृत्त केले. 1972 मध्ये मिशिगन विद्यापीठातून त्यांनी पी.एचडी  मिळवली. साधारण 1969-70 पासून डॉ. गॉर्डन भारतात येताहेत. आपल्या इतिहासाचा अभ्यास करताहेत. त्यासाठी ते मोडी शिकले. मराठीही त्यांना येते. पुणे, मुंबई, औरंगाबादसह ते देशभर फिरलेत. संशोधन केलयं. इतिहासाचा प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे असं डॉ. गॉर्डन  यांना वाटतं. इतिहास म्हणजे भुतकाळाच्या वर्तमानकाळाशी  संवाद. इतिहासाच्या अभ्यासातून आपण नम्रता आणि आशावाद शिकतो असं गॉर्डन यांना वाटतं. एखादं साम्राज्य किती टिकलं ? असा प्रश्न ते विचारतात, त्याचं उत्तर असतं दोन किंवा तीन पिढया. स्वत: सम्राट म्हणवणारेही दोन ती पिढयांमध्ये लयाला जातात हेच इतिहास शिकवतो. त्यामुळं आपणही आपोआप नम्र होतो.  त्यामुळंचं आपल्याला भविष्याबद्दल काय काळजी घ्यावी  याचं मार्गदर्शनही इतिहासाच्या अभ्यासातून होतं. इतिहासातल्या चुका टाळून आपण  चांगला भविष्यकाळ घडवू शकतो.. इतिहास आशावाद शिकवतो तो असा  असं डॉ. गॉर्डन यांना वाटतं.


डॉ. स्टुअर्ट गॉर्डन याचे मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तक

मराठयांच्या इतिहास अभ्यासतांना डॉ. गॉर्डन यांना जाणवली ती मराठयांची लढाऊ वृत्ती. युद्धाचं तंत्र बदलतं गेलं तसं मराठयांनी आपल्या तंत्रातही बदल केला. जगाशी संवाद वाढवत नेला याकडेही ते लक्ष वेधतात.

इतिहास म्हणजे फक्त सत्ताधा-यांचा इतिहास नव्हे तर त्यावेळच्या समाज कसा रहात होता. सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं होतं याचाही अभ्यास असं डॉ. गॉर्डन यांचं मत आहे. आधी महिला इतिहासकार नव्हत्या. त्यामुळं महिलांचा इतिहास दुर्लक्षित राहिला. आता इतिहासातील महिलांवरही मोठया प्रमाणात संशोधन होते आहे याचा त्यांना आनंद आहे. पण दैवतीकरणापासून इतिहासाला जपायला हवा असा इशाराही ते देतात.

गेल्या चार दशकांपासून डॉ. गॉर्डन महाराष्ट्रात येताहेत. पुणे त्याचं आवडतं शहर आहे. एकेकाळी शांत पुण्यात सायकलींची ट्रिंग ट्रिंग ऐकू यायची. रस्ते निवांत होते. गर्दी नव्हती. पुणे एक शांत, हवेशीर शहर होतं. लोक एकमेकांना  सहजपणे भेटायचे, गप्पा व्हायच्या. आता ते पुणे हरवते आहे याची खंत डॉ. गॉर्डन यांच्या बोलण्यातून जाणवते.

भारतात इतिहास संशोधन करत असतांना  डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांना  ध्यानधारणेचीही गोडी लागली. विपश्यनेमुळं आयुष्य बदलल्याची भावना  ते व्यक्त करतात. बोधगयेत त्यांनी विपश्यनेते धडे घेतले.  सकाळी लवकर उठून डॉ. गॉर्डन ध्यान करतात. मोबाईल, टीव्हीपासून दूर रहात आपलं लिखान, वाचन आणि संशोधन करतात. सकाळ ते दुपार हे वेळ ते अभ्यासासाठी वापरतात. सकाळी लवकर उठल्यानं एक वेगळीच उर्जा त्यांना  मिळते. ही उर्जा ते संशोधनासाठी वापरतात. दुपारनंतर मग रोजची कामे करतात. बुद्धाच्या  शिकवणीमुळं एक प्रकारची शांतता डॉ. गॉर्डन यांना लाभली आहे.

पावलावर गौरवशाली इतिहास घ़डला तो  हा आपला गौरवशाली महाराष्ट्र. या परदेशातल्या इतिहास संशोधकाला भेटल्यावर जाणवलं.. की आपल्याच इतिहासाबद्दल अजून कितीतरी गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.

इतिहासाच्या अभ्यासाला लागले ती शिस्त आणि वस्तुनिष्ठता. आपला इतिहास होता तरी  कसा ? हे समजून घेण्यासाठी प्रत्येकानं तटस्थपणे इतिहासाकडे पहायला शिकलं पाहिजे. समाज ख-या अर्थानं इतिहासाबद्दल सजग होईल त्याचवेळी इतिहासाच्या नावाखाली दिशाभूल करणा-यांना आळा बसेल..

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.