लालबागचा राजा, नवसाची रांग आणि मी...

गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला... पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 14, 2013, 04:23 PM IST

www.24taas.com
सुनील घुमे, झी मीडिया

गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला...
पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
राजाच्या मंडपापासून जवळपास दीड किमी अंतरावर आमची बिल्डिंग आहे. साधारणपणे गणेशोत्सवाच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी ही नवसाची रांग बिल्डिंगपर्यंत पोहोचते. पण यंदा गणेश चतुर्थीच्या आदल्याच दिवशी गं. द. आंबेकर मार्गावर राजाच्या भक्तांची नवसाची रांग अॅनाकोंडाच्या शेपटासारखी पसरली होती...
आता याला श्रद्धा म्हणायची की, अंधश्रद्धा..?
कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेशाचे नाव घेऊन करावी, ही झाली श्रद्धा...
पण नवसाला पावतो म्हणून `लालबागचा राजा`च्या रांगेत, 10-15 तास तिष्ठत उभं राहायचं, ही अंधश्रद्धाच झाली...
गणपती म्हणजे गणपती... मग तो लालबागचा राजा असो, गणेशगल्लीचा असो, सिद्धीविनायक असो, नाही तर घराजवळच्या छोट्याशा मंदिरातला असो... देवापुढे नमस्कार करावा, हात जोडावेत, अगदी नतमस्तक व्हावे, इथपर्यंत ठिक आहे. पण देवाकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी तासन् तास असं रांगेत उभं राहणं, याला भोळेपणा नाहीतर दुसरं काय म्हणायचं..?
आश्चर्याची बाब म्हणजे अगदी तान्हुल्या बाळांसह, लहानग्या कच्च्यांबच्चांसह कुटुंबंच्या कुटुंब रांगेत उभी होती. त्यात तरूण-तरूणींची संख्याही लक्षणीय होती. सध्याची तरूण पिढी वाया गेलीय, अशी सार्वत्रिक ओरड केली जाते. त्यामुळे रांगेतली तरूण-तरूणींची संख्या पाहून कुणाला तरी पोरं सुधारतायत, असं वाटू शकेल. पण मला वाटतं की, ही उलट जास्त चिंतेची बाब आहे. `लालबागचा राजा`पुढं नवस केला, तर तो पावतो, ही त्यांची मानसिकता फारच चिंताजनक आहे. `प्रयत्नार्थी परमेश्वर,` असं म्हटलं जातं. पण ही यंग जनरेशन प्रयत्नांची कास सोडून, तासन् तास नवसाच्या रांगेत उभं राहत असेल तर नक्कीच काहीतरी `केमिकल लोचा` आहे...
मी नास्तिक वगैरे नाही... देव नावाची संकल्पना मला देखील मान्य आहे. पण देव एखाद्या विशिष्ट मूर्तीमध्ये किंवा मंदिरामध्येच राहतो, यावर माझा तरी विश्वास नाही. देव हा चराचरात व्यापलेला आहे. निसर्गात आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसातही आहे... मग नवसाच्या रांगेत उभं राहण्याची गरजच काय? मी डोळे मिटले, मनोभावे हात जोडले की माझा नमस्कार देवापर्यंत पोहचायलाच हवा... त्यासाठी प्रसाद, पेढे, हारतुरे, नारळ यांची गरजच काय? एखादं काम व्हावं, म्हणून प्रयत्न करायचे सोडून नवसाच्या रांगेत उभं राहायचं... केवळ नवस करायचा नाही, तर तो पूर्ण झाला तर अमूकतमूक किलो लाडू-पेढे वाहिन, अशी लालूच थेट देवाला दाखवायची... म्हणजे फारच झालं. देवाच्या दरबारात म्हणजे मंदिरात जायचं तर पवित्र मनाने आणि शरीराने जायचं... स्वच्छ स्नान करून देवापुढे प्रसन्न मनानं जायचं असतं... असे संस्कार आपल्यावर असतात. पण नवसाच्या रांगेत 10-15 तास उभे राहणारे, गर्दीत धक्केबुक्के खाणारे, टेम्पररी प्रसाधनगृहांमध्ये शी-सू करणारे, रात्रभर रांगेत पेंगा काढणारे हे `नवसाच्या रांगेतले भाविक` आंघोळ वगैरे न करताच लालबागचा राजाच्या चरणी मस्तक कसे ठेवू शकतात, याचेही राहून राहून आश्चर्य वाटते.
मला आठवतं, लहान असताना आम्ही मार्केटचा राजा पाहायला जायचो... तेव्हा मार्केटचा राजा अशीच त्याची ओळख होती, तो `लालबागचा राजा` झालेला नव्हता... अगदी दहा-पंधरा मिनिटांत त्याचं दर्शन व्हायचं... मार्केटमधली व्यापारी मंडळी तेव्हा भक्तांना निरमाच्या छोट्या पॅकेटमधल्या पावडरी वाटायचे... जाहिरातीसाठी. फुकट सरबत पाजायचे. जाहिरातीसाठी. आणि तिथून मग गरमखाड्यातली जत्रा पाहण्यासाठी आम्ही जायचो... तिथं एक रूपया टाकला की, सोंडेतून एक मोठा कडक बुंदीचा लाडू देणारा गणपती असायचा... खेळणी असायची, खाऊची दुकानं असायची, थम्स अप-कोल्याचे स्टॉल असायचे... पण या नवसवाल्यांच्या आणि मंडळवाल्यांच्या कृपेने गेल्या काही वर्षांत ती सगळी गम्मतच हरवून गेली. हल्ली नवसवाले भाविक जसे वेगळे, तसे मुखदर्शनवाले भाविकही वेगळे झालेत. गरमखाड्याच्या मैदानात आता जत्रा भरत नाही, तिथं भाविकांच्या रांगांची गोलगोल वेटोळी केलेली असतात. गेल्या पाच-सहा वर्षांत मी तरी या गर्दीच्या जंजाळात गेलेलो नाही, पण इथं म्हणे एसीच्या एसी लावलेले असतात. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून कूलर असतात. रात्रभर रांगेत उभे असणा-यांना चहापानाची आणि मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते.
चांगभलं... मार्केटचा राजा आता मार्केटिंगचा राजा झालाय तर...
नवसाची रांग, मुखदर्शनाची रांग... तशी आणखी एक