व्यक्तीगत खेळही निभावणार महत्त्वाची भूमिका - धोनी

गेले काही दिवस टॉस आणि पिचच्या स्थितीला महत्त्व देणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता मात्र खेळाडुंच्या व्यक्तीगत खेळाला महत्त्व असल्याचं म्हटलंय.

Updated: Dec 25, 2012, 05:25 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
गेले काही दिवस टॉस आणि पिचच्या स्थितीला महत्त्व देणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता मात्र खेळाडुंच्या व्यक्तीगत खेळाला महत्त्व असल्याचं म्हटलंय. आजपासून पाकिस्तानविरुद्ध टी २० मॅच बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यापार्श्वभूमीवर धोनी बोलत होता.
भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन टी-२० आणि तीन वनडे मॅचची लढत होणार आहे. यातील पहिली टी२० मॅच आज रंगतेय. इंग्लंडवरुद्धच्या टेस्ट मॅचेसमध्ये टॉस आणि इतर परिस्थितींना अधिक महत्त्व देणाऱ्या धोनीनं आता मात्र या विषयावर बोलणं टाळलंय. ‘प्रत्येक खेळाडू व्यक्तीगत आणि इतरांसोबत कसं प्रदर्शन करतो, हे या मॅचमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे’ असं धोनीनं मॅचच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना धोनी म्हटलंय. कामचलाऊ बॉलर्सलाही चमकण्याची संधी आहे त्यांचं योगदानही महत्त्वाचं ठरेल. दोन्ही टीम बरोबरीच्या आहेत. त्यामुळे ज्या टीमचा खेळाचा करिश्मा चालेल तीच टीम विजयी होऊ शकेल, असंही धोनीनं म्हटलंय.
याशिवाय इतर मॅचेसप्रमाणे या मॅचमध्ये अगोदरच रणनीती ठरवणं कठिण आहे त्यामुळे प्रत्येक पाच – सहा ओव्हर्सनंतर टीम आपली रणनीती ठरवेल, असं धोरण आता धोनीनं आखलंय. मॅचची चांगली सुरुवात करणं हे त्याला आता महत्त्वाचं वाटतंय.