‘पिनकोड’ नंबर चाळीशीत!

पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 17, 2013, 03:48 PM IST

www.24taas.com, मुंबई
पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
पिनकोड अर्थातच ‘युनिक पोस्टल इंडेक्स नंबर’… १९७२ साली हा पिनकोड अस्तित्वात आला. देशातील चार प्रमुख महानगरांपासून झाली आणि कालांतराने ती देशभरात अंमलात आली. तेव्हापासून तुमचा पत्ता या पिनकोडशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या पिनकोडबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी १५ ते २१ जानेवारी दरम्यान ‘पिनकोड सप्ताह’ साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा केला जातो.

‘पिनकोड’ म्हणजे नेमकं काय?
१५ ऑगस्ट १९७२ पासून पिन कोडचीपद्धत देशात लागू करण्यात आली. सहा अंकी असलेला ‘पिनकोड’चा अर्थ नेमका असतो तरी काय? कसे बनवले गेलेत हे पिनकोड... हा सर्वसामान्यांना नेहमी पडणार प्रश्न... तर, या सहा अंकी पिनकोडमधील पहिला क्रमांक संबंधित ‘झोन`ची ओळख दर्शवितो. यासंदर्भात आपल्या झोनचे उदाहरण द्यायचे झाल्यास महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गोवा, छत्तीसगड अशी चार राज्य मिळून क्रमांक ४ हा झोन तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पिनकोडची सुरुवात ४ या आकड्याने होते. दुसरा आकडा हा सब झोन, तर तिसरा आकडा ही त्या जिल्ह्याची ओळख दर्शवितो. तर, शेवटचे तीन आकडे हा टपाल कार्यालयाची संक्षिप्त ओळख मांडत असतात.