पंतप्रधानांच्या राजीनाम्याची काँग्रेसमधूनच मागणी!

पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 13, 2013, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावरुन हटवा अशी मागणी करत काँग्रेसमधील एक गट सक्रीय झाल्याची चर्चा आहे. 2-G तसंच कोलगेट प्रकरणातही पंतप्रधानांच्या समावेशाची चर्चा असल्याने पंतप्रधानांना हटवण्याची मागणी सध्या जोर धरु लागल्याची चर्चा आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटनी आणि वित्तमंत्री पी.चिदंबरम यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचंही सांगितलं जातंय. पण काँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी मात्र या सर्व चर्चा या अफवा असल्याचं सांगत वृत्ताचा इन्कार केलाय.
पवन बन्सल, अश्वनीकुमार यांच्यापाठोपाठ अनेक घोटाळे बाहेर येऊ लागले असताना आता जनतेचा केंद्र सरकारवर विश्वास राहिला नसून पंतप्रधानांनीही आता राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल पंतप्रधान निवासस्थानासमोर जोरदार मोर्चा काढला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.