आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 5, 2014, 09:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंधराव्या लोकसभेच्या या अधिवेशनात ३९ बीलं पास करून घेण्याचं आव्हान सरकारपुढे आहे. तेलंगण राज्य निर्मितीवर या अधिवेशनात शिक्कामोर्तब मिळवायचं आहे. त्याचबरोबर राहुल गांधीना अपेक्षित असलेली सहा भ्रष्टाचाराच्या विरोधातील विधेयकं सरकारला मंजूर करून घ्यायची आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेलंगण विधेयक मंजूर होईल अशी आशा व्यक्त केलीये.
आंध्र प्रदेश विधानसभेनं तेलंगण राज्य निर्मितीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे सीमांध्र आणि तेलंगणा भागातील खासदार हा मुद्दा संसदेत उपस्थित नक्कीचं करतील.
या सर्व गोंधळात लेखानुदान आणि रेल्वेच्या हंगामी अर्थसंकल्पाला सरकारला मंजुरी मिळवायची आहे. या शेवटच्या अर्थसंकल्पातही सरकार जनतेला भुलवण्यासाठी अनेक आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे. पण पंधराव्या लोकसभेतील शेवटच्या अधिवेशनही गोंधळात पार पडण्याची शक्यता आहे. कारण संसदेचं हे अधिवेशन म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केलीय. त्यामुळं हे अधिवेशन वादळी ठरणार अशीच चिन्ह आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.