...आणि लोकसभेत खासदार झालेत भावूक

युपीए दोन सरकरचं अखेरचं अधिवेशन तर पंधराव्या लोकसभेचा आज अखेरचा दिवस. सर्वच पक्षांचे नेते आणि खासदार लोकसभेत गेल्या पाच वर्षांच्या आठवणी जागवत भावूक झाले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2014, 07:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
युपीए दोन सरकरचं अखेरचं अधिवेशन तर पंधराव्या लोकसभेचा आज अखेरचा दिवस. सर्वच पक्षांचे नेते आणि खासदार लोकसभेत गेल्या पाच वर्षांच्या आठवणी जागवत भावूक झाले होते.
यावेळी लोकसभेच्या नेतेपदाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेला उद्देशून भाषण केलं. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घडलेल्या घटनांना उजाळा देत अनेक आठवणी ताज्या केल्या. १५ व्या लोकसभेचा अखेरचा दिवस होता. गेली पाच वर्षं एकमेकांना पाण्यात पाहणारे सर्वपक्षीय खासदार आज शेवटच्या दिवशी मात्र भावूक झालेले दिसले.
सभागृह नेते सुशीलकुमार शिंदेंपासून ते विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यापर्यंत सर्वांनीच पाच वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र आज लोकसभा संस्थगित होण्यापूर्वीच निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय विरोधकांवर आरोपांच्या फैरी सर्वच नेते झाडू लागलेत.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी भुजबळांवर आज नवा हल्लाबोल केला. दुसरीकडे आम आदमी पार्टीचं आरोपसत्रंही सुरू आहे. अंजली दमानिया यांनी काल केलेले आरोप अजितदादांनी आज जाहीर सभेत फेटाळून लावले. तर तिकडे दिल्लीचे पत्रकार परिषद फेम माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसला टार्गेट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.