अफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार

आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 3, 2013, 12:07 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, हैदराबाद
आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.
सायंकाळी बोकारो एक्स्प्रे समध्ये दोन डब्यांतून धूर येत असून, डब्याला आग लागल्याची अफवा पसरल्यानं प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविली आणि घाबरून गाडीबाहेर उड्या घेतल्या. मात्र, दुर्दैवानं बाजूच्या रुळावरून भरधाव येणाऱ्या विजयवाडा-रायगड पॅसेंजरखाली प्रवासी चिरडले गेले.
अपघात झालेलं ठिकाण जंगलात असल्यानं प्रवाशांना अंधारात बाजूचा रूळ दिसला नाही. त्या रुळावर पॅसेंजर येत असल्याचा अंदाज येईपर्यंत अनेकजण चिरडले गेले. घटनास्थळी आतापर्यंत अठरा जणांचे मृतदेह आढळले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्य्ता आहे. मृतांमध्ये पाच लहान मुलांसह तीन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून अपघाताची माहिती घेऊन मदतकार्यासाठी आदेश दिले आहेत. दरम्यान, रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोकारो एक्स्प्रे सच्या कोणत्याही डब्यातून धूर निघालेला नव्हता. काहींनी आगीची अफवा पसरवून लोकांना घाबरवून दिल्यानंच ही घटना घडल्याचं सांगितलं.
दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सात मृत व्यक्तींची ओळख पटलेली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.