काँग्रेसमध्ये गटबाजी चालूच राहील- दिग्विजय सिंग

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी वाढतच्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच काँग्रेसमधील गटबाजीवरही भाष्य केलं. याशिवाय भाजपाने आपल्यावर केलेल्या कुठल्याच आरोपांचा पुरावा भाजपाकडे नसल्याचाही दावा केला.

Updated: Jul 2, 2012, 09:05 AM IST

www.24taas.com, भोपाळ

 

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी वाढतच्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच काँग्रेसमधील गटबाजीवरही भाष्य केलं. याशिवाय भाजपाने आपल्यावर केलेल्या कुठल्याच आरोपांचा पुरावा भाजपाकडे नसल्याचाही दावा केला. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली, तर भाजपाच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल असं अश्वासनही त्यांनी दिलं.

 

एका आयएएस दांपत्याकडे ३५० कोटी रुपयांची संपत्ती सापडते, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. हल्ली अनेक लहान सहान कर्मचाऱ्यांच्या घरात कोट्यावधी रुपये आढळतात. तसंच जर आयकर विभागाने एखाद्या मंत्र्याच्या घरावर धाड टाकली, तर सहज करोडो रुपये हाती लागतील असं दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे.

दिग्विजय सिंग यांच्या मते काँग्रेसमध्ये पूर्वीही गटबाजी होती, आजही आहे आणि भविष्यातही ती चालूच राहील. मात्र युवक काँग्रेसच्या लोकांनी यावर काम करावं. १९५२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच काँग्रेसने नेहमी तरुणांना प्रोत्साहन दिलं आहे. आपण स्वतःही युवक काँग्रेसमार्फतच राजकारणात सक्रिय झालो असल्याची आठवणही दिग्विजय सिंग यांनी काढली.