शहीद भगत सिंग यांचं `ते` पत्र ८३ वर्षांनी मिळालं

देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगत सिंग यांचं ८३ वर्षांपूर्वींचं हरवलेलं पत्र मिळालंय. पत्रात त्यांनी क्रांतिकारक हरिकिशन तलवार यांच्या खटल्यात वकिलांच्या वृत्तीबद्दल लिहिलंय.

Updated: Mar 23, 2014, 01:11 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगत सिंग यांचं ८३ वर्षांपूर्वींचं हरवलेलं पत्र मिळालंय. पत्रात त्यांनी क्रांतिकारक हरिकिशन तलवार यांच्या खटल्यात वकिलांच्या वृत्तीबद्दल लिहिलंय.
जवाहर लाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक चमन लाल यांनी शहीद भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके लिहिली आहेत. चमन लाल यांनी त्यांचं पुस्तक `भगत सिंग `वर दुर्मिळ दस्तऐवज` यामध्ये हे पत्र प्रकाशित केलंय.
२३ डिसेंबर,१९३० रोजी हरिकिशन तलवार यांनी लाहोर विद्यापीठातील एका समारंभात पंजाबचे राज्यपाल यांना गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या हल्लात हरिकिशन बचावले आणि एक पोलीस निरीक्षक मारला गेला. `हरिकिशन तलवार यांच्या खटल्याला अनुसरुन भगत सिंग यांनी लिहिलेलं पत्र हरवलं होतं` असं, चमन लाल यांनी सांगितलं. भगत सिंग यांचं पहिलं लिहिलेलं पत्र हरवलं म्हणून दुसरं पत्र लिहावं लागलं असं, त्यांनी दुसऱ्या पत्रात नमूद केलंय.
हरिकिशन यांचा राज्यापालांना मारण्याचा उद्देश नव्हता असा तर्क खटल्यावेळी वकिलांनी लावला होता. मात्र वकिलांच्या या वृत्तीवर भगत सिंग नाराज होते. हरिकिशन हे शूर योद्धा आहेत आणि वकिलांनी त्यांचा राज्यपालांना मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता असं बोलून अपमान करु नये हे भगत सिंग यांनी पत्रात लिहिलं होतं.

चमन लाल यांनी सांगितलं की, भगत सिंग यांनी फाशीचा दिवस २३ मार्च, १९३१ याआधी दोन महिने म्हणजेच जानेवारी १९३१मध्ये हे पत्र लिहिलं. राज्यपालांना मारण्याचा प्रयत्न आणि पोलीस निरीक्षकांचा हल्ल्यात झालेला मृत्यू याप्रकरणात ९ मार्च, १९३१ला हरीकिशन यांना फाशी देण्यात आली.
भगत सिंग यांचं १९३१मध्ये हरवलेलं पत्र ८३ वर्षांनी सापडलं. मात्र हे पत्र हरीकिशन यांना फाशी दिल्यानंतर १८ जून, १९३१ रोजी `हिंदू पंच` पेपरमध्ये छापण्यात आलं. झाशीतील पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रांची प्रत पंडित राम शर्मा यांच्याकडे आहे. त्यांनंतर त्यांनी हे पत्र पलवलतील रघुवीर सिंग यांना दिलं. रघुवीर सिंग यांच्याकडे पत्र मिळालं आणि ते पत्र आता तब्बल ८३ वर्षांनी लोकांच्या समोर येईल असं चमन लाल यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.