'अनुष्कावर टीका करणाऱ्यांच्या आयुष्यात प्रेम नाही'

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर विराट कोहलीवरुन अनुष्का शर्माला चिडवणाऱ्यांवर भडकले आहेत.

Updated: Mar 29, 2016, 04:59 PM IST
'अनुष्कावर टीका करणाऱ्यांच्या आयुष्यात प्रेम नाही'  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर विराट कोहलीवरुन अनुष्का शर्माला चिडवणाऱ्यांवर भडकले आहेत. विराटच्या मैदानावरील यशाचा संबंध अनुष्काशी जोडणारे लोक म्हणजे 'फ्रस्ट्रोज' (वैतागलेले) असून त्यांच्या आयुष्यात काही प्रेम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

सोमवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे अनुष्का शर्मावर विनोद करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. अनुष्काला दोष देणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असं त्यानं म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता सुनील गावसकरांचे वक्तव्य आले आहे. 

'ते आयुष्यात वैतागलेले आहेत इतकंच मी सांगू शकतो. विराट आणि अनुष्काच्या सध्याच्या प्रेमसंबंधांविषयी मला कल्पना नाही. पण, ते दोघे एकत्र खूप सुंदर दिसले. अनुष्काही एक चांगली मुलगी आहे. विराट भारतासाठी खंबीरपणे उभा राहण्याची सुरुवात झाली तेव्हा तिनेच त्याच्या आयुष्यात स्थिरता आणली. खुद्द विराटनंही हे मान्य केलंय की तिने त्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणली आहे,' असं त्यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलंय. 

'अनुष्का सामना पाहायला आली म्हणून विराट बाद झाला असं लोक म्हणतात. पण, तो आऊट झाल्याने त्याला काय मिळालं? त्याला काय ड्रेसिंग रुमच्या बाहेर जाऊन तिला भेटता आलं? नाही. मग? मला माहित नाही, पण असे तर्क लावणारे लोक मला मूर्ख वाटतात. त्यांच्या आयुष्यात प्रेम नाही असं मला वाटतं. म्हणूनच एका साध्या मुलीविषयी ते असं बोलतायत,' अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.