शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान

 भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

Updated: Oct 2, 2014, 06:37 PM IST
शिवसेनेकडून खडसेंना मतदारसंघातच कडवे आव्हान title=

जळगाव :  भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबरच आव्हान होते.

आता मात्र शिवसेनेचेही कडवे आव्हान असून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांना झुंज द्यावी लागणार आहे. खडसे हे सलग २० वर्षे आमदार असले तरी त्यांना शिवसेना कसे घेरते हे येथे औत्सुक्याचे असणार आहे. 

सातत्याने चार वेळा निवडून येणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासाठी मुक्ताईनगरमधील यंदाची निवडणूक वाटते तेवढी सोपी आणि एकतर्फी मुळीच नाही. 

लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघा अंतर्गत असलेल्या विधानसभेच्या सहा पैकी मुक्ताईनगरमधील भाजपच्या मताधिक्याचा क्रमांक पाचव्या स्थानी म्हणजे शेवटून दुसरा आहे. खडसेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यातून होणारा अंतर्विरोध यातून स्पष्ट होतो. तुल्यबळ विरोधक नसतांनाही खडसेंसमोर विजयाचे आव्हान कायम आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशभरात मोदी लाट असल्याचे चित्र होते. रावेरमध्येही विक्रमी मताधिक्याने रक्षा खडसे निवडून आल्या. रावेरअंतर्गत असलेल्या विधानसभेच्या सहा मतदार संघांपैकी एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपला ४२ हजार ६६० मताधिक्य मिळाले, जे अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कमी होते.

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिलेले खुले आव्हान, स्थानिक शिवसेनेचा अंतर्गत विरोध व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी द्यावी लागणारी झुंज या पार्श्वभूमीवर खडसे यांना यंदा कडवी लढत द्यावी लागू शकते. विशेष म्हणजे मतदारसंघशतील मराठा आणि लेवा पाटील समाजातील सुप्त वादही त्यांची वाट अवघड बनू शकते. 

खडसे यांच्यासमोर ही सर्व आव्हान असली तरी भावी मुख्यमं‌त्रिपदाचे उमेदवार असा भाजप प्रचार करीत असल्यामुळे त्यांचे मताधिक्य सुध्दा वाढवू शकतो. 

एकेकाळी काँग्रेसचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात १९९० पासून सातत्याने एकनाथ खडसे निवडून येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप आणि विशेषत: खडसे यांनी आपले जाळे निर्माण केले असून ग्रामपंचात आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत ६० टक्के उमेदवार त्यांचे समर्थकच निवडून आले आहे. 

गेल्या २० वर्षात खडसेंना मिळालेल्या मतांमध्ये सातत्याने वाढच झाल्याचे दिसते. भुसावळपासून जवळ असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात रावेर तालुक्यातील ४५, मुक्ताईनगर तालुक्यातील ८१ व बोदवड तालुक्यातील ५० अशी १७४ गावे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे हे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या भाजप इतके सक्षम नसले तरी ते प्रत्येक निवडणुकीत आव्हान निर्माण करतात.

भाजपकडून खडसे हे भावी मुख्यमंत्री असल्याचे चित्र जिल्ह्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रंगवले गेले. राज्यातील अन्य विभागांचा मुख्यमंत्री झाला मग उत्तर महाराष्ट्राला हा मान का नको, असा सवाल खान्देशच्या नेत्यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीत खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे विजयी झाल्यामुळे त्याचा फायदाही त्यांना होणार आहे.  गेल्या २५ वर्षात या मतदार संघात खडसे यांनी मुक्ताईनगरला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे पर्यटन विकासासाठी शंभर कोटींची कामे झाली आहेत.

मात्र, अद्याप अनेक कामे बाकी आहेत. बोदवड सिंचन योजना, विविध रस्ते, लहान मोठे पूल, प्रशासकीय इमारतींचे बांधकाम, विस्थापितांचे पुनर्वसन, घरकुल उभारणी आदिवासी विकास अशी अनेक कोट्यावधी रुपयांच्या कामांचा लेखाजोखा भाजपकडून मांडला जातोय.

 मात्र, मतदार संघात कोणतेही मोठे उद्योग नाहीत. तसेच व्यापारालाही चालना नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, काही ठिकाणी रस्ते चांगले असले तरी संपूर्ण मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशाच आहे. कृषी विकासासाठी सिंचनाची अधिक गरज अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.