राज्यात आज 25 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक, 8 ठिकाणी चूरस

राज्यातील 25 जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवडणूक होतीये. या निवडणुकीत संख्याबळ असूनही भाजप सत्तेपासून दूर रहावं लागणार असल्याची चिन्हं आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2017, 11:38 AM IST
राज्यात आज 25 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक, 8 ठिकाणी चूरस title=

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवडणूक होत आहे. तर 8 ठिकाणी चूरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत संख्याबळ असूनही भाजप सत्तेपासून दूर रहावं लागणार असल्याची चिन्हं आहेत. 

राज्यातील ग्रामीण भागात भाजपचा विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या खेळीमुळं राज्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजपला फटका बसणाराय. सर्वात मोठा पक्ष असूनही तिथं भाजप सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. 

जालना, औरंगाबाद, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेनं युती केली असती तर भाजपला सत्ता स्थापन करणं सहज शक्य झालं असतं. मात्र या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिलीय. यापैकी केवळ जालनामध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषध अध्यक्ष होणार आहेत. तर इतर ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचं समाधान शिवसेनेला मिळणार आहे.

यामुळं भाजपला आता केवळ वर्धा, लातूर, चंद्रपूर, जळगाव आणि गडचिरोली या ठिकाणीच सत्ता स्थापन करणं शक्य होणाराय. तर बीडसह काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एखादा गट फोडून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.