विरार रेल्वे स्टेशनवर भरदिवसा एकाची हत्या

रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका माथेफिरुने भरदिवसा एकाची हत्या केलीय. 

Updated: Apr 11, 2016, 08:15 PM IST

विरार : रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका माथेफिरुने भरदिवसा एकाची हत्या केलीय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिथं अनेक प्रवासी होते मात्र एकाही व्यक्तीने त्या माथेफिरुला रोखण्याचं धाडस केलं नाही. 
 
या ब्रिजवर प्रवाशांची गर्दी होती. मात्र अचानक पळपळ झाली. एका माथेफिरुने गर्दीतल्या एका व्यक्तीवर चाकू हल्ला केला होता. कोणाला काही कळायच्या आत हे सगळं घडलं. तो माथेफिरु त्या तीस - पस्तिशीच्या वयातील व्यक्तीवर एकापाठोपाठ एक वार करत होता. मात्र त्याला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. 

खरं तर ब्रिजवर लोकांची मोठी गर्दी होती. तिथं असलेल्यांनी ठरवलं असतं तर या माथेफिरुला रोखता आलं असतं. आणि या निरपराध व्यक्तीचा जीव वाचला असता, मात्र तसं घडलं नाही, हा माथेफिरु तब्बल 15 ते 20 मिनिटं तिथं नंगानाच करत होता.

महेंद्र कुमार पाल हाच तो माथेफिरु आऱोपी ज्याने निर्दयीपणे खून केलाय, त्याने ही हत्या का केली ? याचा अद्यापही उलग़डा झाला नाही. तसेच आरोपी महेंद्रच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. 

विरार स्टेशनला जोडणाऱ्या पूलावर भरदिवसा ही घटना घडल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय. या ब्रिजवर फ़ेरीवाले आणि गर्दुल्यांनी कब्जा केला आहे, रात्रीच्यावेळी इथं गर्दुलांचं साम्राज्य असतं त्यामुळे रात्री या ब्रीजवरुन जाणं जोखमीचं ठरतंय.