अपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती

पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

Updated: Jul 30, 2014, 11:20 PM IST
अपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती title=

पुणे :  जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आज पहाटे गावकरी गाढ झोपेत असताना काळानं गावावरच निर्दयी घाला घातला.

आतापर्यंत 19 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले (UPDATE 08.00 PM)

डोंगरकडा कोसळल्यानं माळीण गावातील 44 घरं गाडली गेली असून, तब्बल १६० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत 19 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

माळीण गावातली डोंगराच्या पायथ्याशी असलेली तब्बत ७०० ते ८०० जणांची ही वस्ती होती. त्यामुळं अडकलेल्यांच्या आकड्याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण जातंय.

अनेक वाहनं घटनास्थळी असल्यामुळं ट्राफीक जॅम (UPDATE 07.35 PM
माळणी गावातल्या दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या मोठ्या कसोशीनं अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. १०० ते १५० अँबूलन्स घटनास्थळी आहेत. 

तडीनं जिल्हा पोलीस प्रशासनानं जेसीबी आणि पोकलँडचा ताफा घटनास्थळी तैनात केला असून, ढिगारा उपसण्याचं काम जोमानं सुरू आहे. मात्र प्रचंड पाऊस आणि चिखलामुळं मदतकार्यात अडथळे येतायत.

आणखी काही जेसीबींची आवश्यकता आहे. मात्र अनेक वाहनं घटनास्थळी असल्यामुळं ट्राफीक जॅम झालाय. गाड्यांच्या लांबच लांब रागां लागल्या आहेत. त्यामुळं जेसीबी पोहचण्यातही अडथळे येत आहेत. 

तीन दिवस बचावकार्य चालणार (UPDATE 07.10 PM)
मदतीसाठी आसपासच्या गावातल्या लोकांचीही मदत घेण्यात येत आहे. घटनास्थळी असून जेसीबी आणि पोकलँडच्या मदतीनं अडकलेल्यांना काढण्याचं काम सुरू आहे. तीन दिवस बचावकार्य चालणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलीय. 

पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली (UPDATE 06.55 PM)
माळीण सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं.डिंभे धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनवर्सन माळीण गावात करण्यात आलं होतं. प्रामुख्यानं आदिवासी शेतक-यांची घरं गावात होती. पण निसर्गाचा कोप झाला आणि हे गाव डोंगराखाली गाडलं गेलं. केवळ घरं आणि माणसंच नाहीत, तर जनावरं आणि गावचं मंदिर देखील या आपत्तीमध्ये उद्धवस्त झालं.

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस घटनास्थळी (UPDATE  06.15 PM)
मात्र डिंभे धरणापासून सुमारे 40 किमी अंतरावर अत्यंत दुर्गम भागात माळीण गाव वसलं असल्यानं सकाळपर्यंत एवढ्या मोठ्या दुर्घटनेची साधी माहितीही कुणाला नव्हती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काळानं कशी क्रूर झडप घातलीय, त्याचा अंदाज आला. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली.

दुपारी साडेबारापर्यंत जवळपास 30 अँबुलन्स, पोकलँड, जेसीबी घटनास्थळी (UPDATE  06.05 PM)
अकराच्या सुमारास पिंपरी चिंचवडहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकड्या दुर्घटनास्थळी रवाना झाल्या. दुपारी साडेबारापर्यंत जवळपास 30 अँबुलन्स, पोकलँड, जेसीबी घटनास्थळी कसेबसे पोहोचले. डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुर्गम भागात हे गाव वसलं होतं. 

मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळं झालेला चिखल आणि गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं मदतकार्यात अडथळे येत होते. आसपासच्या गावातले लोक मदतीसाठी धावून आले. त्यांच्या सहकार्यानं घोडेगाव पोलीस आणि आपत्ती निवारण टीमच्या जवानांनी बचावकार्याला सुरूवात केली. ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सध्या युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांना माहिती ( UPDATE 05.56 PM)
माळीण गावातली 44 घरं त्यातल्या माणसांसह ढिगा-याखाली गाडली गेल्याच्या वृत्तानं सर्वांचाच थरकाप उडाला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसह ते दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देण्यासाठी तत्काळ रवाना झाले. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव... कायमचं काळाच्या उदरात गडप झालंय. आता उरलीय ती फक्त चिखलमाती.

माळीण गावातील बचावकार्यासाठी मंचरमध्येही कंट्रोल रूम सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ( UPDATE  05.50 PM)

बस ड्रायव्हरच्या सर्वात आधी लक्षात आलं (UPDATE 05.30 PM)

माळीण हे अख्ख गाव गाळाखाली गेलं आहे हे सर्वात आधी एसटी ड्रायव्हरला लक्षात आलं. सकाळची पहिली एसटी गावात आली, पण ड्रायव्हरला नेहमी दिसणार गाव जरा वेगळचं दिसलं आणि गावावर डोंगराचा गाळ मोठ्या प्रमाणात वाहून आलाय, आणि गावचं दबलंय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने जवळच्या पोलिस स्टेशनला सकाळी साडेसातच्या सुमारास ही माहिती दिली.

बचाव कार्य वेगाने सुरू (UPDATE 05.16 PM)

माळीण गावातील बचाव कार्यासाठी पुण्यात कंट्रोल रूम बनवण्यात आलाय. घटनास्थळी गाळ काढण्याचं काम सुरू आहे. दोन ते तीन मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. कच्चा रस्ता असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. एनडीआरएफचे 3 हजार जवान घटनास्थळी आहेत. मात्र सर्वगावावर गाळ फिरल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. (UPDATE 05.16 PM)

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात आता 160 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

घटनास्थळी जेसीबी मशीन मदतीसाठी पोहोचलं आहे.

भीमाशंकर कारखान्याच्या कामगारांनी मदतकार्य सुरू केलं आहे. (UPDATE 01.49 PM)

पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. हे गाव दुर्गम भागात असल्याने मदत यंत्रणा पोहोचण्यास विलंब लागत आहे. दरम्यान, लष्करी जवानांची मदत घेण्यात आली आहे. या ठिकाणी कंट्रोल रुम उभारण्यात आलाय.

आंबेगाव तालुक्यात दुर्गम भागात आदिवासी आणि मजूर लोकांची माळीण गावात वस्ती आहे. ७५० लोकसंख्या लोकवस्तीचे हे गाव आहे. ३० ते ३५ घरे गाढली गेल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी पहाटे दरड कोसळल्याने गावातील जवळपास ३०० लोक अडकल्याचे भीती व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाऊस पडत आहे. त्यामुळेच ही मोठी दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

माळीण गावात भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे कामगार आणि कर्मचारी मदतकार्य करीत आहेत. तसेच ग्रामस्थांनीही मदतकार्य सुरु केलेय. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यास उशीर झालाय. पोकलेन आणि जेसीबीची मदत घेण्यात आली. मात्र, परिसर दुर्गम असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्यातच पाऊस कोसळत अल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे.

एनडीआरएफची दोन पथके माळीण गावाच्या दिशेने रवाना झाली आहेत. मदत आणि बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.