मुंबईत एका कांद्यावरुन घडलं महाभारत!

एक साधा कांदा काय कऱू शकतो... याचं धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आलंय... कांद्यामुळं मयुर जाधव चक्क जखमी झालाय आणि त्याला बारा टाके पडलेत...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 2, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एक साधा कांदा काय कऱू शकतो... याचं धक्कादायक उदाहरण मुंबईत समोर आलंय... कांद्यामुळं मयुर जाधव चक्क जखमी झालाय आणि त्याला बारा टाके पडलेत...
एक दिवस असा येईल, की कांद्यावरुन रक्त सांडेल, अशी भविष्यवाणी आतापर्यंत कुणी वर्तवली नसेल... पण आता हे प्रत्यक्षात घडलंय... गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्यानं सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलंय... कांद्याची चोरी होऊ लागली... पण त्याही पुढं जात आता कांद्यावरुन मारामाऱ्या होऊ लागल्यायत.
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये कांद्यावरुन इतकी हाणामारी झाली की, त्यामध्ये मयुर जाधव नावाचा मुलगा जखमी झालाय... कांद्याची एक प्लेट एक्स्ट्रॉ मागितली म्हणून वेटरनं मयुरला चक्क हाणामारी केली... त्यामध्ये मयूरला बारा टाके पडलेत... या हाणामारीत मयुरचा डोळा थोडक्यात वाचलाय...
मयुर आणि हॉटेलच्या स्टाफमध्ये कांद्यावरुन मारामारी झाली, ती मोहम्मद अली रोडवरच्या शालिमार हॉटेलमध्ये. मारामारी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. कांद्याचे भाव वाढल्यानं मुंबईतल्या अनेक हॉटेल्सनी ग्राहकांना कांदा देणं बंद केलंय.
तर काही हॉटेल्समध्ये आतापर्यंत जेवणाबरोबर फुकट मिळणाऱ्या कांद्यांसाठी पैसे आकारणं सुरू केलंय. इतकंच नाही तर मुंबईतल्या भेळवाल्यांनीही भेळेत कांद्याऐवजी कोबी वापरायला सुरुवात केलीय... आता तर कांद्यावरुन चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्यात... लवकरच उपाययोजना झाल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.