... या प्रेमी युगुलाची अशीही कहाणी!

मुलगी रणदीरकौर संधू आणि मुलगा राजेश खुशलानी हे दोघं पिंपरी-चिंचवडहून मुलीच्या वडिलांकडून हत्या होण्याची भीती असल्यानं हे दोघे मुंबईला पळून आले होते. त्यानंतर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2013, 09:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पिंपरी-चिंचवडहून मुंबईला पळून आलेल्या एका प्रेमी युगलाला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. मुलगी रणदीरकौर संधू आणि मुलगा राजेश खुशलानी हे दोघं पिंपरी-चिंचवडहून मुलीच्या वडिलांकडून हत्या होण्याची भीती असल्यानं हे दोघे मुंबईला पळून आले होते. त्यानंतर या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पिंपरी-चिंचवड आणि मुंबई पोलीसांच्या देखरेखीखाली मुंबईत या दोघांचे जबाब नोंदवले जावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
मुलगी रणदीपकौर संधू आणि मुलगा राजेश खुशलानी हे दोघे पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत. शाळा आणि कॉलेजमध्ये यांनी एकत्र शिक्षण घेतलं. यादरम्यान या दोघांमध्ये रेशीमगाठी जुळल्या आणि लग्न करुन आयुष्यभरासाठी एक होण्याचा निश्चयही त्यांनी केला. पण, मुलगी रणदीपकौरच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं... कारण मुलगा राजेश हा रणदीप कौरच्या परीवाराच्या तुलनेत गरीब आहे म्हणून रणदीपकौरच्या परीवारानं यांच्या लग्नाला परवानगी नाकारली. मुलीला घरात जबरदस्तीनं डांबूनही ठेवलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला.
निसटण्याची संधी मिळताचं रणदीपकौर आणि राजेश पुण्यातून मुंबईला पळून आले आणि लग्न केलं. रणदीपकौरच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आपल्या संपत्तीसाठी आपल्या मुलीला फसवल्याचा आरोप त्यांनी केलाय. पण, राजेशनं हा आरोप फेटाळलाय. मुलीच्या वडिलांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा राजेशचा आरोप आहे.
मुलीच्या वडिलांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संगनमत करुन या दोघांच्या हत्येचा कट रचला असल्याचं या दोघांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. ‘मुलीच्या वडिलांनी दिलेल्या धमकीमागे पित्याची भावना समजून घ्या’ असं कोर्टानं या प्रकरणावर आपलं मत नोंदवलं. परंतु, अशा प्रकरणांमध्ये प्रेमी युगुलांच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात दोघांचे जबाब नोंदवण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.