खड्ड्यांबाबत अखेर महापौरांनी दिली कबुली!

मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी झाल्याची कबुली खुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिलीय. 

Updated: Jul 26, 2016, 09:17 AM IST
खड्ड्यांबाबत अखेर महापौरांनी दिली कबुली!  title=

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी झाल्याची कबुली खुद्द महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिलीय. 

मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी नागपूरच्या कंपनीला कंत्राट दिले होते. विशेष 'पॉटहोल फिलर सिस्टीम'द्वारे हे खड्डे भरले जाणार होते. यासाठी पहिल्या टप्प्यात ३ लाख रूपये किंमतीचा १० टन माल मागवण्यात आला.

मात्र, नागपूरच्याच कंपनीला हे कंत्राट का? यावरुन विधानसभेत वादंगही उठला होता. यामागे मुख्यमंत्र्यांचं कनेक्शन असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. 

या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणींचं कारण देत आता पालिका प्रशासनानं नागपूरच्या या कंपनीचं कंत्राट मागे घेत दुसऱ्या कंपनीला हे कंत्राट देण्याची तयारी पालिकेनं सुरु केलीय.