मोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती

देशातल्या सर्व शाळांमध्ये पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यंदाचा शिक्षक दिन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थानं वेगळा ठऱणार आहे. 

Updated: Aug 29, 2014, 07:23 PM IST
मोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती title=

मुंबई : देशातल्या सर्व शाळांमध्ये पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यंदाचा शिक्षक दिन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थानं वेगळा ठऱणार आहे. कारण केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं तसा फतवाच काढलाय. शिक्षक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. हे भाषण देशातल्या सर्व शाळांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पाहणं आणि ऐकणं सक्तीचं करण्यात आलंय.

ज्या शाळांमध्ये टीव्ही नसतील त्याठिकाणी उसनवार तत्वावर टीव्ही आणून भाषण पाहण्याची सक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केली आहे. दुर्गम भागात टीव्ही दाखवणं शक्यच नसेल तर रेडिओवर भाषण ऐकण्याची सोय करण्याचेही आदेश दिले आहेत. तसंच किती विद्यार्थ्यांनी भाषण ऐकलं त्याचा अहवालही पाठवणं बंधनकारक कऱण्यात आलंय. त्यासंदर्भातले आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून शाळांना पाठवण्यात आलेले आहेत. 

पंतप्रधान मोदी यांचे भाषण टेलीव्हिजवर प्रसारित होणार असल्याने शाळेमध्ये टीव्ही संचासमोर विद्यार्थ्यांना बसण्याची कार्यवाही करावी, टीव्हीनसेल तेथे काहीही करुन टीव्ही आणवालाच लागणार आहे. तुम्ही उसनवारीवर टीव्ही आणा. लाईट नसेल तर जनरेटर लावा, असे स्पष्ट लेखी आदेश देण्यात आले आहेत. तसेच व्हीडिओ कॉफरन्सही त्यासाठी घेण्यात आली असून कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेसने मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा खरा चेहरा पुढे आल्याचे काँग्रेसने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.