संसद बरखास्त करा – व्ही. के. सिंह

पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 29, 2012, 07:45 PM IST

www.24taas.com मुंबई
पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी सिंह यांनी ही मागणी केली. सरकार अल्पमतात आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात जात आहेत. काळ्या पैशाबाबत सरकार गप्प का? आदिवासींच्या जमिनी लाटल्या जात आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. काळा पैसा भारतात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजे. केंद्र सरकार घटनेविरोधी असल्याने संसद तत्काळ बरखास्त करून निवडणुका घ्याण्यात याव्यात, असे सिंह म्हणाले.
केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम आदमीसोबत सरकारला काही देणेघेणे नाही. सरकारने जनतेचे अन्न आणि रोजगार हिसकावून घेतला आहे. लोकांनी यावर आपली तीव्र प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांच्या हाती काहीच राहणार नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष शांत आहेत. जनतेचा विरोध असतानाही थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली. हे धोरण बाधक असल्याचे ते म्हणालेत.
यावळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदीर टीका केली. आपण ३० जानेवारीपासून राज्याचा दौरा करणार आहोत. त्यानंतर देशातही दौरे केले जातील, असे अण्णांनी स्पष्ट केले. हे सरकार अजूनही लोकपाल बिल आणू शकलेले नाही.हे सरकार देश चालवायच्या लायकीचे नाही, अशी टीका अण्णा यांनी केली.
इंग्रजांपेक्षा जास्त सरकारच लूट करीत आहे. लोकांमध्ये जनजागृती झाली पाहीजे. तरच परिवर्तन होईल. जनतेत जाऊन जागृती करणार. जनतेसाठी सध्या व्यासपीठ नाही. त्यासाठी लढा उभारण्यासाठी नव्या टीमची बांधणी सुरू आहे. नव्या टीममध्ये येण्याचे निमंत्रण अण्णा हजारे यांनी आमिर खानला दिले दिले आहे.