रेल्वे, बस प्रवास आजपासून महाग

अर्थसंकल्पातील तरतुदी आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याचा भार आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसोबत रेल्वेचे आरक्षण आणि बेस्टचा प्रवासही महागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2013, 07:03 AM IST

www.24taas.com, मुंबई

अर्थसंकल्पातील तरतुदी आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याचा भार आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसोबत रेल्वेचे आरक्षण आणि बेस्टचा प्रवासही महागणार आहे.

रेल्वे प्रवाशांनाही महागाईचे चटके बसणार असून तत्काळ तिकीट दरात कमीत कमी ९० रुपये आणि जास्तीत जास्त १७५ रुपये वाढ करण्यात येणार आहे. वातानुकूलित कुर्सी यानमध्ये १०० ते २०० रुपये वाढ करण्यात येणार असून आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात १० ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. वातानुकूलित तिकिटाच्या आरक्षणाचे शुल्क १५ ते २५ रुपयांनी वाढेल.

केंद्र सरकारने वर्षभरात दुसर्यांदा केलेली इंधन दरवाढ आणि वाढता आस्थापना खर्च भागवण्यासाठी ‘बेस्ट’नेही किमान भाडेवाढ एक रुपयाने वाढवली आहे. त्यानुसार आता बेस्टचे किमान तिकीट सहा रुपये होणार असून पासमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ३५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. वातानुकूलित बसच्या तिकीट दरातही पाच रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे मौज मजा करणाऱ्यांचा खिसा थोडासा हलका होणार आहे. कारण एसी रेस्टॉरण्टमध्ये खाणे-पिणे, विदेशी कार आणि मोटारसायकल, चहा, सिगारेट, २००० रुपयांवरील मोबाईल आदी महाग होणार आहे.