‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!

ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 13, 2013, 09:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
विक्रांतला वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनी पुढाकार घेतलाय. पण त्याचवेळी इतर राजकीय आणि बॉलीवूडच्या सोहळ्यांसाठी पाण्यासारखा पैसा ओतणारे उद्योगपती विक्रांतच्या बाबतीत मात्र गप्प आहेत. तर काही राजकारणी विक्रांतचं सोयीस्करपणे राजकारण करतायत.
विक्रांत युद्धनौकेच्या मदतीसाठी अनेक हात सरसावलेत. विक्रांतचं संग्रहालय व्हावं, ही तर श्रींची इच्छा म्हणत मुंबईतली गणेश मंडळं विक्रांतसाठी धावून आलेत. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेनं त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील.
तर दुसरीकडे विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनाच्या मुद्द्यावर देशातल्या उद्योगपतींवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. विक्रांतच्या संवर्धानसाठी उद्योगपतींचा हात आखडता का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. विविध राजकीय, बॉलीवूड सोहळ्यांसाठी पैसा लावणाऱ्या उद्योगपतींनी विक्रांतसाठीही आपल्या थैल्या रिकाम्या कराव्यात, असं आवाहन राऊत यांनी केलं.

शिवसेना, मनसे पाठोपाठ राष्ट्रवादीनंही विक्रांत बचावासाठी उडी घेतलीय. विक्रांत वाचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांकडे निवेदन दिलंय.

ठाणे महापालिकेनंही विक्रांतच्या संवर्धनासाठी ५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केलीय. ज्यांनी विक्रांतचं संवर्धन करणं अपेक्षित आहे, तेच जर विक्रांतकडे दुर्लक्ष करत असतील, तर सामान्य माणसांनीच पुढाकार घ्यायला हवा, कारण प्रत्येक भारतीयाचा अभिमान या युद्धनौकेशी जोडला गेलाय. ‘थेंबे थेंबे तळे साचून’च विक्रांतसाठी निधी उभा राहिला, तर ती विक्रांतसाठी आणि भारतासाठीही गौरवाचीच गोष्ट ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.