ऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 17, 2013, 05:21 PM IST

www.24taas.com, नागपूर
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.
आजही नेहमी प्रमाणे नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आसाराम बापू आले आणि त्यांनी त्यांच्या हजारो भक्तांवर पाण्याचे फवारे उडवले. नागपूर महानगरपालिकेने पुरवलेल्या टेंकरच्या च्या माध्यमाने पाण्याच्या नासाडीचा हा खेळ झाला. महत्वाचे म्हणजे, राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव असतानाही आणि नागपुरात देखील उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असले तरीही भक्तांपैकी एकानेही त्यांचा विरोध केला नाही. पण समाज प्रबोधनाचे काम करत असल्याचा दावा करणाऱ्या आसारामबापूंना विरोध करण्याचा प्रयतच्न अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला. समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत याचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या बाबाने आता पाण्याचा अपव्यय टाळावा हि मागणी केली. बापूला पाणी देणे थांबवावे अशी मागणी त्यांनी नागपूर महानगर पालिकेकडे देखील केली. मात्र तरीही आसाराम बापूंनी ही धुळवड साजरी केलीच.

जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, अशी संतांची महाराष्ट्रात ओळख आहे. राज्यातली जनता दुष्कात होरपळत असताना, ही अशी धुळवड साजरी करणारे आसाराम बापूंना संत म्हणायचं काय, असा संतप्त सवालही यानिमित्तानं उपस्थित होतेय. आता राज्यभरातून आसाराम बापूंच्या या कृत्यावर चौफेर टीकेला तोंड फुटलंय.