राम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक

अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 27, 2013, 01:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना राम कदम यांनी दारू पाजून धिंगाणा घालायला लावला असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. तर पुरावे द्या अन्यथा १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं प्रतिआव्हान राम कदम यांनी मलिक यांना दिले....
महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱया राड्याबद्दल बोलण्यासाठी हे दोन्ही नेते झी 24 तासवर आमने-सामने आले तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरलेली पातळी या वादातून स्पष्टपणे दिसली.....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी काल बिअरबारमध्ये कार्यकर्त्यांना दारू पाजली आणि राडा करण्याचे आदेश दिले. याचे फुटेज माझ्याकडे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना असल्याचा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी केला.
त्यावर, तुमच्याकडे फुटेज असेल तर ते झी २४ तासला द्यावे, अन्यथा मी तुमच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेल. मी काल दिवसभऱ घरात होतो. घटना घडल्यानंतर मला पोलिसांनी ताब्यात घेतले. माझ्या घरात सीसीटीव्ही आहेत. त्याचे फुटेज मी झी २४ तासला उपलब्ध करू देऊ शकतो. त्यामुळे नवाब मलिक यांचे आरोप खोटे आहेत.