वडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी

आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

Updated: Apr 9, 2017, 07:12 PM IST
वडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी  title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. वडिलांवर अंत्यसंस्कार करून आलेल्या ऋषभ पंतनं ३६ बॉलमध्ये ५७ रन्सची खेळी केली. ऋषभच्या या इनिंगमध्ये चार सिक्स आणि तीन फोरचा समावेश होता.

बुधवारी उत्तराखंडच्या रुडकीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं ऋषभचे वडिल राजेंद्र पंत यांचं निधन झालं. गुरुवारी वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यावर ऋषभ पुन्हा एकदा दिल्लीच्या टीममध्ये आला आणि शनिवारी त्यानं ही जिगरबाज खेळी केली.

सचिन-कोहलीच्या पावलावर पाऊल

ऋषभच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंही असाच निर्णय घेतला होता. वडिलांच्या निधनानंतर सचिन आणि कोहलीनंही अशाच प्रकारे मैदानात उतरायची हिंमत दाखवली होती २००६ साली दिल्लीकडून रणजी खेळताना विराटच्या वडिलांचं निधन झालं होतं. यानंतर त्यानं मॅच खेळायचा निर्णय घेतला आणि कर्नाटकविरुद्ध ९० रन्सची खेळी केली.

१९९९ च्या वर्ल्ड कपवेळी सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनामुळे सचिन एक मॅच खेळू शकला नाही पण यानंतरच्या पुढच्या मॅचमध्ये केनियाविरुद्ध सचिननं शानदार सेंच्युरी झळकावली होती. 

पाहा ऋषभची जिगरबाज खेळी