खेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार

रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 24, 2013, 03:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले सगळे जण मालाडमधील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळतेय. मुंबईच्या दिशेने निघालेल्या क्वालिस गाडीला समोरुन येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने क्वालिसमधील ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले. रात्री उशीरा झालेला हा अपघात एवढा भीषण होता की जागीच या सर्वांनी प्राण गमावले. मृतांमध्ये मालाडमध्ये राहणाऱ्या पाच पुरुष, तीन महिलांसहीत चार लहान मुलांचाही समावेश आहे.

माने आणि चव्हाण कुटुंबातील हे सर्व जण संगमेश्वर इथे विवाह जमवण्यासाठी गेले होते तिथून मुंबईला परतत असताना काळाने घाला घातला. तिथून परतताना खेडजवळ चव्हाण यांच्या क्वालिसला भरधाव वेगाने येत असलेल्या एका डंपरने धडक दिली. या धडकेमुळे क्वालिसगाडी रस्ताच्या कडेला फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. हा अपघात नेमका कसा झाला? ते अजूनही समजू शकलेले नाही. अपघातानंतर या भागात बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.