देवराई

ऋषी देसाई पावसाळा सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना. रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.

Updated: Jun 29, 2012, 12:05 AM IST

ऋषी देसाई

www.24taas.com

पावसाळा  सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना.  रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.  शहरीकरणाच्या, औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जंगलाची खुलेआम कत्तल केली जाते. पुणे-मुंबई-नाशिक-औरंगाबाद-कोल्हापूर या महानगरांमध्ये वसाहतीसाठी शहरं पार डोंगरमाथ्यावर जाऊन कधी भिडली कळलंच नाही. आता तर सर्व महानगरांमध्ये मेट्रो आणि महामार्ग चौपदरीकरणाच्या नावा़खाली वृक्षांची बेसुमार तोड केली जातेय. बदलत्या समाजरचनेत माणूस माणसालाच विसरत चाललाय, तिथे  पंचमहाभूतं, निसर्गदेवता, वनदेवता, वनराई या गोष्टींना कोण लक्षात ठेवणार? माणूस स्वतःच्या स्वार्थापायी निसर्गावर मात करुन 'वसुंधरा बचाव'च्या गप्पा ठोकू लागलाय. वनराई वाचवणं जरी शक्य नसलं तरी 'देवराई' मात्र वाववायलाच हव्यात. आता काहींना प्रश्न पडेल की, देवराई वाचवणार काय? देवराई हा तर सिनेमा आहे तो पहायला हवा असं म्हण ना! मुळात गंमत हीच आहे की शहरी लोकांचा देवराई म्हणजे स्क्रिझोफेनिया तर ग्रामीण लोकांचा देवराई म्हणजे भुताखेताची वस्ती हा गैरसमज आहे. दोघेही आपल्या जागेवर योग्यच आहेत. 'देवराई' म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात त्याची गरज, या लेखातून सांगण्याचा प्रयतत्न...

 

 

'देवराई' म्हणजे देवांचं जंगल. गावच्या आजूबाजूला असलेल्या रानाचा काही भाग देवासाठी राखून ठेवला जातो. या भागास देवराई म्हणतात. देवराई म्हणजे देवांसाठी राखीव ठेवलेलं पवित्र वन. वृक्षावर देवतांचा आणि पूर्वजांचा वास असतो. त्यांचं आश्रयस्थान सुरक्षित रहावं हे आपलं कर्तव्य, या भावनेन संरक्षित केलेलं वन म्हणजे 'देवराई'.या भागामध्ये कुणीही प्राण्यांची शिकार करत नाही, कोणताही वृक्ष तोडत नाहीत. त्यामुळे त्या भागातले वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, वनस्पती, आपोआप जतन केले जातात. गावाची पंचायत, वनखातं देवराईची काळजी घेते. ही झाली सोप्या भाषेतील देवराईची ओळख. आता याच देवराईची उदाहरण देऊन ओळख देते. मेळघाट सार्‍यांनाच ठाऊक आहे. जैवविविधतेने परिपूर्ण व सुपीक शेतजमीन मेळघाटात असल्याने गवताळ कुरणे व त्यावर उपजिविका करणारे हरीण, सांबर, काळवीट, गवा यासारखे अनेक तृणभक्षी प्राणी तिथे पहायला मिळतात. आदिवासी समाज हा मेळघाटातील मूळ रहिवासी. त्यांच्या परंपरा, सांस्कृतिक मूल्यं आणि येथील वनांच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांनी स्थापन केलेल्या वनरक्षक समित्या या फार पूर्वीपासून वनसंवर्धनातील महत्वाच्या घटक राहिल्या आहेत. गंमत म्हणजे त्या आदिवासींच्या, 'आम्हाला ग्रीन कार्ड द्या किंवा आम्हाला वनखात्यात घ्या तरच आम्ही जंगल सांभाळू अशा मागण्या नसूनही ते वनरक्षणाचे काम मनापासून करतात. मेळघाटातील आदिवासी अतिशय श्रद्धापूर्वक या वनाची पूजा करायचे. या श्रध्देतूनच आजवर येथील वनाचे संरक्षण आणि संवर्धन झाले आहे.मेळघाटच नाही तर आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीत देवराई हा महत्त्वाचा घटक होता. कालाय तस्मै नमः म्हणत आपण त्याला सोयीस्करपणे विसरत आहोत.

 

आपल्या देशात अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जमाती आहेत. त्यांच्या असंख्य परंपरा आणि तेहतीस कोटी देव आहेत. अगदी दगडापासून ते थेट पाण्यालाच देव मानणारे अनेक जण आहेत.या सर्व भिन्नतेत सगळ्यांमध्ये दुवा साधणारी परंपरा आहे देवराईची. भारताच्या कानाकोपर्‍यांत अगदी हिमाचल प्रदेशातील बर्फाळ भागातून ते उष्ण,दमट केरळपर्यंत तसेच राजस्थानच्या रखरखीत वाळवंटापासून ईशान्य भारतातल्या डोंगराळ मणिपूर ही परंपरा शेकडो वर्षांपासून जिवंत आहे. देवराईंना भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, कोकणात राय, महाराष्ट्रात देवराई, पश्चिम महाराष्ट्रात देवराठी किंवा देवाचे बन, हिमाचल प्रदेशात देवभूमी, राजस्थानात अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये मंदिरवन, देवरा किंवा ओरन, गोव्यात देवरान, केरळमध्ये काव्यू तर मणिपूरमध्ये मामखप किंवा मऊह