अन्यायाविरोधातली चीड बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमधून उमटत होती... १९६० च्या दशकातली फ्री प्रेस जर्नलमधली बाळासाहेबांची व्यंगचित्रं चांगलीच लोकप्रिय व्हायला लागली. त्याच दरम्यान व्यंगचित्रांसाठी स्वतंत्र साप्ताहिक असावं, असं बाळासाहेबांना वाटू लागलं आणि ऑगस्ट १९६० मध्ये व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ची स्थापना झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते मार्मिकचा प्रकाशन सोहळा झाला.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमुळे मराठी माणूस जागा झाला, पण त्याला एकत्र आणण्यासाठी संघटना काढण्याची कल्पना बाळासाहेबांना सुचली. प्रबोधनकारांनी या संघटनेसाठी नाव सुचवलं शिवसेना आणि १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांचे प्रश्न घेऊन राजकारणात उतरलेल्या शिवसेनेनं अवघ्या एका वर्षात ठाणे नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं. लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९६८ मध्ये मुंबई महापालिकाही शिवसेनेच्या ताब्यात आली. बाळासाहेबांनी धडाडीनं सीमाप्रश्न हाती घेतला याच आंदोलनाप्रकरणी बाळासाहेबांना ९ फेब्रुवारी १९७० ला अटक झाली. सत्तरच्या दशकात शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. पुढे शिवसेनेची भूमिका आणखी आक्रमक पद्धतीनं मांडण्यासाठी २३ जानेवारी १९८९ ला सामना हे वृत्तपत्र प्रत्यक्षात आलं. १९९० मध्ये २३.६४ टक्के मतांसह शिवसेना विरोधी पक्ष ठरला. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले आणि पुढच्याच निवडणुकीत १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. १९८८ मध्ये शिवसेनेचा फक्त एक आमदार राज्याच्या विधानसभेत होता. आणि अवघ्या सात वर्षांत शिवसेनेची राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण गिरीश व्यास प्रकरणी मनोहर जोशींवर आरोप होताच, बाळासाहेबांनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना मुख्यमंत्रिपद दिलं. पुढच्या निवडणुकीत युतीची सत्ता गेली. पण मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळला तर मुंबई महापालिकेवर मात्र शिवसेनेची सत्ता कायम राहिली. |