तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा जबरदस्त कमबॅक, पंड्याचा वादळी स्पेल

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार कमबॅक केलं आहे.

Updated: Aug 19, 2018, 09:12 PM IST
तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा जबरदस्त कमबॅक, पंड्याचा वादळी स्पेल title=

नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार कमबॅक केलं आहे. हार्दिक पंड्याच्या वादळी स्पेलमुळे इंग्लंडची टीम १६१ रनवर ऑल आऊट झाली. यामुळे भारताला तब्बल १६८ रनची आघाडी मिळाली आहे. हार्दिक पंड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉस बटलरनं ३२ बॉलमध्ये ३९ रनची जलद खेळी केली. हार्दिकच्या टेस्ट कारकिर्दीमधल्या या पहिल्या ५ विकेट आहेत.

ओपनर एलिस्टर कूक आणि किटन जेनिंग्सनं इंग्लंडला ५४ रनची सुरुवात करून दिली. पण यानंतर इंग्लंडची पडझड सुरूच झाली. स्कोअरबोर्डवर १२८ रन असताना इंग्लंडचा नववा बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये गेला. पण जॉस बटलरनं जलद रन करून इंग्लंडला १६१ रनपर्यंत पोहोचवलं.

तत्पूर्वी तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलरनी सुरुवातीलाच भारताला धक्के दिले. यामुळे भारताचा ३२९ रनवर ऑल आऊट झाला आहे. भारतानं दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०७/६ अशी केली होती. पण ब्रॉडनं २ आणि अंडरसननं २ विकेट घेत भारताची इनिंग संपवली. दुसऱ्या टेस्ट मॅचमधल्या खराब कामगिरीनंतर भारतीय बॅट्समननी या मॅचमध्ये पुनरागमन केलं. ओपनर शिखर धवन आणि लोकेश राहुलनं ६० रनची पार्टनरशीप केली. यानंतर मात्र भारताची अवस्था ८३-३ अशी झाली. पण कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं भारतीय बॅटिंग सावरली. कोहली आणि रहाणेमध्ये १५९ रनची पार्टनरशीप झाली. विराटनं १५२ बॉलमध्ये ९७ रन केले तर अजिंक्य रहाणेला १३१ बॉलमध्ये ८१ रन करता आले.

इंग्लंडकडून अंडरसन, ब्रॉड आणि क्रिस वोक्सनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर आदिल रशीदला एक विकेट मिळाली. विराटनं आदिल रशीदच्या बॉलिंगवर स्लिपमध्ये उभा असलेल्या स्टोक्सला कॅच दिला. या दौऱ्यामध्ये रशीदनं कोहलीला चौथ्यांदा आऊट केलं आहे. रशीदनं वनडे सीरिजमध्ये विराटला दोनवेळा आऊट केलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्यांदा नरवस नाईंनटीजचा शिकार झाला. याआधी  २०१३ साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहली ९६ रनवर आऊट झाला होता.

पाच टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे सीरिज जिंकण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा