मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या. आमीर खान त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. परंतु यावर अभिनेत्याने आपलं वक्तव्य दिलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलमध्ये आमीर आपल्या चाहत्यांना लग्नाची माहिती देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


असे देखील बोलले जात आहे की, अभिनेत्याला त्याच्या चित्रपटाबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे, त्यामुळे तो सध्या लग्नाची घोषणा करणार नाही.


किरण रावपासून घटस्फोट घेतल्यापासून अभिनेत्याचे नाव अनेकदा फातिमा सना शेखशी जोडले गेलं आहे. फातिमासोबत त्याच्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. फातिमा आमीर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटांमध्ये दिसली होती.


तेव्हापासून आमीर आणि फातिमा सना शेख रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती आणि लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे.


मात्र, याबाबत अभिनेत्रीला विचारले असता तिने यावर आपले वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.


फातिमाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र होते, जेव्हा जेव्हा माझी आई हे सर्व टीव्हीवर पाहायची तेव्हा तिला खुप दु:ख होतं. माझा फोटो वर्तमानपत्रात आला की, तिला खूप आनंद व्हायचा, पण हेडलाईन वाचून मात्र तिचा चेहरा उतरायचा. माझ्याबद्दलच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाही त्रास व्हायचा. त्यानंतर मी विचार केला की मी माझे म्हणणे सर्वांसमोर ठेवावे."


पुढे अभिनेत्री म्हणाली, "बोलणे हे लोकांचे काम आहे, ते बोलतीलचय  मला माहित आहे की, मी चुकीची नाही आणि मला या सगळ्यात काही स्पष्टीकरण देण्याची गरजही नाही."


अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर देखील सर्वत्र आमिर खान लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता जोपर्यंत आमीर खान काही वक्तव्य करत नाही तोपर्यंत ही चर्चा कदाचित अशीच सुरू राहिल.